बेळगाव ता. खानापूर : खानापूर तालुक्याच्या भीमगड अरण्य व्याप्तीच्या दुर्गम भागातील अबनाळी गावातील 144 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ माजली आहे. काही दिवसांपूर्वी या गावात सर्दी, पडसे, ताप, जुलाबाची साथ आली होती. त्यावेळी आरोग्य विभागाच्या पथकाने अबनाळीला भेट देऊन सर्वांची आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधे दिली. त्यावेळी गावातील एकूण 240 जणांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 144 जण पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आला आहे. अर्ध गावचं कोरोनाबाधित आढळल्याने 18 एप्रिलला गावातच लग्न झाल्यामुळे अख्ख्या वऱ्हाडींची चिंता वाढली आहे.
यामुळे तहसीलदार रेश्मा तालिकोटी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय नांद्रे, पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, पोलीस उपनिरीक्षक बी. एस. पाटील, व्ही. एस. अवटी आदांनी तातडीने अबनाळीला जाऊन परिस्थितीची पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. हरिशकुमार यांनीही खानापूरला तातडीने भेट देऊन तहसीलदार कार्यालयात संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने उपाययोजना हाती घेण्याची सूचना दिली. गावातील एका जुन्या विहिरीतील पाणी पिण्यासाठी वापरल्याने गावातील बर्याच लोकांना ताप व सांधेदुखीचा त्रास झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे आरोग्य खात्याने जवळपास 250 जणांची तपासणी व त्यांच्यावर उपचार केले होते. आता ते सर्वजण या आजारातून बरेही झाले आहेत. पण त्यावेळी घेतलेल्या स्वॅबचा अहवाल तब्बल 15 दिवसांनी मिळाला. त्यामध्ये 144 जण पॉझिटिव्ह असल्याचे उघडकीस आले.
या संदर्भात गावातील कुणालाही माहिती नव्हती. मंगळवारी सकाळी गावात आरोग्य खात्याचे अधिकारी पोहोचल्यावरच गावकर्यांना याची माहिती मिळाली. पण आम्ही सर्वजण आता बरे आहोत, असे असताना अहवाल पॉझिटिव्ह कसा येतो, असा संभ्रम गावकर्यांत निर्माण झाला. आठवड्यापूर्वी गावातील लोक आजारी पडले आणि ते बरेही झाले. यामुळे गावात दोन दिवसांपूर्वी (18 एप्रिल) एक विवाह समारंभही झाला होता. एकाच वेळी एवढ्या जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील, याची कुणालाही कल्पना नव्हती. 18 एप्रिल रोजी [ पाटील परिवार (वधू) आणि सावंत परिवार (वर रा. गणेबैल ता. खानापूर) ] ज्या गावात लग्न झालं त्या अबनाळी गावातील अर्ध गावचं कोरोनाबाधित आढळल्याने अख्ख्या वऱ्हाडींची चिंता वाढली आहे. आपण तर कोरोना पॉझिटिव्ह येत नाही ना? अशी भीती लग्नाला आलेल्या प्रत्येकाला वाटू लागली आहे. या लग्न समारंभातील हजर झालेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे प्रशासनाला धडकी भरली आहे
गावच्या रस्त्यावर प्रवेशबंदी करण्यात आली असून परिस्थिती पूर्वपदावर येईपर्यंत ग्रामस्थांनी घरातच थांबावे. सकस आहार घ्यावा, कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी आरोग्य विभाग व तालुका प्रशासनाची संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. गावात मास्क वापरणे, सामाजिक अंतर राखणे, शुद्ध पाणी पिणे तसेच दिलेली औषधे घेऊन कोरोनावर मात करण्याचा सल्ला यावेळी अधिकार्यांनी गावकर्यांना दिला. तसेच शिरोली ग्रामपंचायतीलाही याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना केली.