देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची कमतरता जाणवू लागली आहे. रेमडेसिवीर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर टाटा उद्योग समुहाने दोन दिवसांपूर्वीच पुढाकार घेत 200-300 टन ऑक्सिजन मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र मंगळवारी पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवहानानंतर आता टाटा ग्रुपने थेट परदेशातून भारतीयांसाठी सुविधा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा ग्रुपने मोठ्या आकाराचे 24 ऑक्सिजन वाहक सिलेंडर्स आयात करण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील सर्व नागरिकांना केलेलं आवाहन कौतुकास्पद आहे. आम्ही टाटा कंपनीकडून भारतातील आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी जे प्रयत्न शक्य आहेत ते सर्व करण्यास कटीबद्ध आहोत. ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी आम्ही असाच एक निर्णय घेतला आहे, असं ट्विट टाटा ग्रुपच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन करण्यात आलं आहे. टाटा ग्रुपने द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजनची देशभरामध्ये वाहतूक करण्यासाठी 24 मोठे कंटेनर आयात करण्याचा निर्णय घेतलाय.
आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आमचे हे प्रयत्न असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. दोन दिवसांपूर्वीच कंपनीने ट्विटरवरुन 200 ते 300 टन ऑक्सिजन पुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला होता. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन अत्यंत महत्वाचा आहे. देशात निर्माण झालेली गरज लक्षात घेता आम्ही रोज अनेक राज्यं आणि रुग्णालयांना 200 ते 300 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करत आहोत. या लढाईत आम्हीदेखील आहोत आणि नक्कीच आपण जिंकू, असा विश्वास टाटा स्टीलने माहिती देताना व्यक्त केलेला.