बेळगाव : बहुचर्चित बेळगाव - धारवाड रेल्वेमार्गाच्या कामाचा ठेका राईट्स लिमिटेड (रेल इंडिया टेक्निकल अँन्ड इकॉनॉमिक सर्व्हिस) कंपनीला मिळाला आहे. केंद्र शासनाचा उपक्रम असलेल्या या कंपनीची स्थापना 1974 मध्ये झाली आहे. रेल्वे खात्याकडून बेळगाव धारवाडसह तीन रेल्वे मार्गाच्या कामाची जबाबदारी या कंपनीकडे दिली आहे. बेळगाव - धारवाडसह व शिमोगा - शिकारीपूर - राणेबेन्नूर, तुमकूर - दावणगेरे या दोन रेल्वेमार्गांचे काम या कंपनीकडून केले जाणार आहे. तब्बल ₹ 4027 कोटी रुपये या तिन्ही रेल्वे मार्गांसाठी खर्च केले जाणार आहेत.
सध्या आंध्रप्रदेशमधील गुटी ते धर्मावरम तसेच अन्नूपूर - पेंड्रा या दोन रेल्वे मार्गाचे काम कंपनीकडून सुरू आहे. ही दोन्ही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. बेळगाव - धारवाड रेल्वे मार्ग अनेक वर्षे चर्चेत आहे. बेळगावचे दिवंगत खासदार सुरेश अंगडी रेल्वे राज्यमंत्री असताना प्रकल्प मंजूर झाला. या प्रकल्पाच्या कामासाठी कंपनीही नियुक्त झाली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार आहे. बेळगाव - धारवाड रेल्वेमार्ग राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 ला समांतर असेल. 97 किमी लांबीच्या या रेल्वेमार्गासाठी ₹ 545 कोटी रुपये निधी खर्च केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनासाठीचा खर्च राज्य शासनाकडून दिला जाईल.
2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूदही केली आहे. या मार्गासाठी 2003 मध्ये सर्वेक्षण सुरू झाले होते. 2012 मध्ये सर्वेक्षण अहवाल रेल्वे बोर्डाकडे सादर केला होता. या रेल्वे मार्गावर एकूण 13 थांबे असतील. त्यात हालगा, गणीकोप्प, तिगडी, संपगाव, बैलवाड, बैलहोंगल, नेगीनहाळ, हुन्शीकट्टी, कित्तूर, तेगूर, हेग्गेरी, मोमीनगट्टी, क्यारकोप्प यांचा समावेश आहे. बेळगाव व क्यारकोप येथे रेल्वे जंक्शन होणार आहे. या मार्गातील रेल्वेचा प्रवास कमी खर्चात व कमी वेळेत होणार आहे. बेळगाव व धारवाड ही दोन शहरे नव्या रेल्वे मार्गामुळे आणखी जवळ येणार आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांच्या विकासाच्या दृष्टीनेही हा मार्ग महत्वाचा ठरणार आहे.
बेळगाव -धारवाड (व्हाया कित्तूर 73 किमी - 335 हेक्टर जमीन) या मार्गासाठी 50 कोटी रुपये राखीव ठेवले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी 1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प सादर केला. बेळगाव - कितूर - धारवाड (Belgaum to Dharwad via Kittur या रेल्वे मार्गाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली होती. आता या रेल्वे मार्गासाठी जमीन हस्तांतरण करण्यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. बेळगाव व धारवाड जिल्ह्यातील एकूण 335 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. नियोजित बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर या रेल्वे मार्गामध्ये शेकडो हेक्टर सुपीक जमीन जाणार आहे. बेळगाव - धारवाड नूतन रेल्वेमार्ग नंदिहळ्ळी, गर्लगुंजी व नागेनहट्टी गावावरुन जाणार आहे. बेळगाव धारवाड या नव्या रेल्वे मार्गासाठी अंदाजे 927 कोटी रुपये खर्च येणार आहे. 73 कि. मी. रेल्वे मार्गासाठी एकेरी रेल्वेमार्ग घालण्यात येणार आहे.
कितूरमार्गे होणाऱ्या नव्या रेल्वे मार्गामुळे तासाभरात बेळगाव - धारवाड असा रेल्वे प्रवास करता येणार आहे. तसेच 31 कि. मी. चे अंतर कमी होणार असल्याने वाहतुकीलाही चालना मिळणार आहे. या नवीन मार्गावर बेळगाव सह देसुर, के.के.कोप्प, बागेवाडी, एम. के. हुबळी, हूलीकट्टी, कित्तूर, तेगुर, ममिगट्टी, क्यारीकोप्प आणि धारवाड अशी स्थानके असतील.