बेळगाव शहरात काही ठिकाणी चार दिवसांआड, तर काही भागांत आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत आहे. आमदार अभय पाटील यांनी याची दखल घेत रद्द झालेली 24 तास पाणी योजना पुन्हा मंजूर करून घेतली आहे. या कामाचा प्रारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला आहे. सदर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने गांभिर्याने दखल घेतली नसल्याने तीन वर्षापूर्वी ही योजना रद्द करण्यात आली होती. मात्र, आमदार पाटील यांनी प्रयत्न करुन या योजनेची अंमलबजावणी करणे भाग पाडले आहे.
यासाठी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री दिवंगत अनंतकुमार यांच्या मदतीने तत्कालिन केंद्रीय नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांच्याकडून योजना पुन्हा सुरू करण्यास केंद्राकडून अनुमोदन मिळविले. त्यानंतर आमदार पाटील यांनी राज्यात अनेकवेळा अधिकारीवर्गाच्या बैठका घेतल्या. त्यातून ₹ 804 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेस मंजुरी मिळवून घेतली. या कामाचा प्रारंभही करण्यात आला आहे.
804 कोटी खर्चातून योजनेंतर्गत बेळगाव शहरातील 1 लाख 20 हजार घरांना चोविस तास निरंतरपणे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी 61.22 किलोमीटर नव्याने जलवाहिनी घालण्यात येणार आहे. दुसऱ्या मजल्यावरील घरांनाही पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने व्यवस्था करण्यात येणार आहे. Larsen & Toubro कंपनीला या योजनेची निविदा मिळाली असून कंपनीने कामही सुरू केले आहे.