बेळगाव ता. खानापूर : बेळगाव - पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी झाडशहापूर ते खानापूर या मार्गावरील 90 टक्के काम पूर्णत्वास आले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आता उर्वरित कामांनाही गती देण्यात आली आहे. खानापूर ते बेळगाव या दरम्यान गणेबैल या ठिकाणी टोलनाक्याची उभारणी केली जाणार असून गेल्या आठ दिवसांपासून टोलनाका उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक वाहनांना टोलमधून सूट देण्यात येणार की पासचे वितरण होणार याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे.
टोल आकारणीचे स्वरूप आणि दर अद्याप निश्चित करण्यात आलेले नसले तरी टोलनाक्याच्या उभारणीनंतर खानापूर - बेळगाव मार्गावरील प्रवास महागणार हे मात्र निश्चित आहे. गणेबैल, इदलहोंड, निट्टर, प्रभुनगर, देसुर, झाडशहापूर येथील पूल वाहतुकीसाठी यापूर्वीच खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे आता टोल नाक्याच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. इदलहोंड आणि गणेबैल या दोन गावांच्यामध्ये टोलनाक्याची उभारणी केली जात आहे.
अशोक बिल्डकॉन कंपनीने त्यांच्या अखत्यारीतील होनकल क्रॉस पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण केले आहे. मलप्रभा नदी वरील पूल, रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल तसेच हत्तरगुंजी व करंबळ क्रॉसनजीकच्या महामार्गाचे काम शिल्लक आहे. येत्या दीड दोन महिन्यात सर्व पुलांची कामे मार्गी लावण्याचे नियोजन कंत्राटदार कंपनीने केले आहे. महामार्गाच्या कामापाठोपाठ दुभाजकावर रोपांची लागवड, रस्त्याच्या दुतर्फा झाडांची लागवड तसेच पथदीप व नाम फलकांच्या उभारणीचे कामही पूर्ण झाले आहे. ज्या ठिकाणी महामार्गाचे सर्व काम पूर्ण झाले आहे तेथून नव्या महामार्गावरून वाहतूकही सुरू करण्यात आली आहे.
टोलनाका यंत्रणा, दोन्ही बाजूला स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय केली जाणार आहे. या टोल नाक्याचे निर्वहन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांभाळले जाणार आहे. अद्याप टोलची रक्कम निश्चित करण्यात आलेली नाही. तथापि स्थानिक नागरिक शेती व अन्य कामांसाठी दररोज या मार्गावरून ये-जा करणार असल्याने त्यांना टोलमधून सूट देण्याची मागणी केली जात आहे.