बेळगाव : सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम असताना उचगाव गावातील एक वयस्कर आई मात्र आपल्या मुलांचा सांभाळ करण्यात व्यस्त आहे. हलाखीची परिस्थिती आणि उतारवय असतानाही शेतात मजुरी करून पोटच्या तरण्याताठ्या मतिमंद मुलांचे संगोपन करणाऱ्या आनंदी सुरेश दावतार या महिलेला फेसबुक फ्रेंड्स सर्कलने 6 महिने पुरेल इतक्या जीवनावश्यक साहित्याची मदत करून दिलासा दिला आहे.
आनंदीबाई सुरेश दावतार या उचगाव येथे एका छोट्याश्या भाड्याच्या घरात राहात असून यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यातच महादेव (वय वर्ष 39) व यल्लाप्पा (वय वर्ष 28) या मानसिक व शारीरिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या दोन मुलांचा अतिशय खडतर परिस्थितीत त्यांना सांभाळ करावा लागत आहे. कोणाचाच आधार नसल्याने काम केल्याशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे आनंदी आपल्या मुलांना घरात ठेवून इतरांच्या शेतात दिवसभर मोलमजुरी करून या दोन मुलांचा सांभाळ करीत आहेत. सकाळी मुलांना जेवण भरवून गेल्या की पुन्हा दुपारी घरी येऊन त्यांना पुन्हा दोन्ही मुलांना भरवाव लागत. त्यामुळे निर्धास्त कामावरही जाता येत नाही आणि घरी सुद्धा राहता येत नाही, अशा द्विधा मनस्तीतीत आनंदीबाई दिवस काढत आहेत. आपल्या दोन्ही मुलांच्या औषधोपचाराचा खर्च, घर भाडे व रोजच्या पोटा पाण्याचा खर्च भागविण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
त्यांच्या संघर्षाची माहिती समजताच फेसबुक फ्रेंड्स सर्कलने त्वरित पुढील 6 महिन्याहून अधिक पुरेल अश्या सर्व जीवनावश्यक वस्तूंची जुळवाजुळव करून आनंदी दावतार यांना मदतीचा हात दिला. तसेच इथून पुढेही सर्वतोपरी आवश्यक ती मदत करण्याचा विश्वास दिले. सध्या गणेशोत्सवाची धामधूम असताना अचानक मिळालेल्या मदतीने आनंदीबाई मात्र भारावून गेल्या व त्यांनी मदतीबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर, कॅन्टोन्मेंट मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत बिर्जे, सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील त्याचबरोबर उचगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मिथिल जाधव, पवन देसाई, अमोल जाधव आदी उपस्थित होते.
सदर उपक्रमासाठी पद्मप्रसाद हुली, प्रदीप होसमनी, अजित कुलकर्णी, राजू काकती, रवींद्र बेल्लद,आदी इंटरप्रायजेस, समीर खान व रिझवान बेपारी यांचे सहकार्य लाभले. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या,कामधंदे बंद पडून आधीच अडचणीत असणारी कुटुंबे अजूनच अडचणीत सापडली. अश्या वेळी फेसबूक फ्रेंड्स सर्कलच्या टीमने फटाके किंवा इतर अनावश्यक वस्तूवर पैसे न खर्च करता या रक्कमेतून समाजातील अनेकांना मदतीचा हात देऊन समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे.