बेळगाव : बेळगाव महापालिका निवडणुकीत दक्षिण मतदारसंघातून काँग्रेसला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. मात्र, ही निवडणूक काँग्रेसला नांदी ठरली आहे, असे मत प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केले. येथील काँग्रेस भवनामध्ये काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेवक व कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत व्यासपीठावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, कार्याध्यक्ष आर. ध्रुवनारायण, आमदार गणेश हुक्केरी, महांतेश कौजलगी, माजी आमदार फिरोज सेठ, अशोक पट्टण, जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष विनय नावलगट्टी, शहर अध्यक्ष राजू सेठ होते.
बाहेरील लोकांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसला महापालिका निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले, अशी टीका होत आहे. मात्र, एकूणच निवडणुकीत पक्षाला अपेक्षेनुसार यश मिळाल्याचा दावाही आमदार जारकीहोळी यांनी केला. महापालिकेवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी बेळगाव शहरासाठी उत्तम प्रकारे कार्य करावे. त्याचबरोबरच पक्ष संघटनेचे कामही करावे. पुढील निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी एकसंध होऊन कार्याला लागावे, असे आवाहनही आमदार जारकीहोळी यांनी केले. यावेळी काँग्रेस पक्षाचे अन्य नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.