बेळगाव ता. चिकोडी : मांजरी व येडूरवाडी सीमेलगत 50 एकरांतील ऊस अचानक आग लागून जळाला. त्यात शेतकऱ्यांचे ₹ 81 लाखांवर नुकसान झाले. बुधवारी दुपारी ही घटना घडली. बुधवारी दुपारी शेतकरी पोपट कोळी, सनत कोळी, सुरेश पाटोळे, जयराम कानडे, भगवान हावळे, माधुरी दाभोळे, धोंडीराम बेडगे यांच्या ऊस पिकास आग लागली. त्यामध्ये पन्नास एकरांतील ऊस जळून खाक झाला.
जुलैमध्ये लागवड केली होती. सध्या पिकाने पक्व अवस्था गाठली होतील. कृष्णेच्या महापुरातून कसेबसे ऊस पीक वाचले होते. पुरामुळे मोठ्या प्रमाणात उसाचे पाचट वाळल्याने पिकास आग लागली. बघता बघता आगीने रौद्र स्वरूप धारण केले. शेतकरी, चिकोडी येथील सरकारी आणि चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तोपर्यंत पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.
या घटनेत 50 एकरांवरील ऊस भस्मसात झाला. त्यात 81 लाखांचे नुकसान झाले. चिदानंद कोरे साखर कारखाना व शिरोळ दत्त कारखान्याला ऊस नोंद होता. यंदाचा गळीत हंगाम सुरू न झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.