आजी, माजी आणि भावी…! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण!

belgavkar.com | belgaum | belgavkar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या निमित्ताने आज औरंगाबादमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील या कार्यक्रमांना उपस्थित आहेत. आज औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या एका विधानावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. भविष्यात शिवसेना आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा यावरून सुरू झाली आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार रावसाहेब दानवे आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड हे देखील उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच केलेल्या विधानामुळे तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.
मुख्यमंत्र्यांचा रोख दानवे, कराडांच्या दिशेने..? मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरुवात करताना व्यासपीठावरच्या उपस्थित मान्यवरांना संबोधताना आजी-माजी सहकाऱ्यांचा उल्लेख केला. मात्र, यावेळी मागे बघून त्यांनी भावी सहकारी म्हणून देखील संदर्भ दिला. त्यामुळे नेमका मुख्यमंत्र्यांचा रोख कुणाकडे आहे? याविषयी चर्चा सुरू झाली. “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे त्यावरून वेगवेगळे तर्क काढले जात आहेत.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना मागे वळून व्यासपीठावर बसलेल्या व्यक्तींकडे पाहिलं. यावेळी व्यासपीठावर रावसाहेब दानवे आणि भागवत कराड हे देखील उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या विधानामधून शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याचेच तर संकेत द्यायचे नव्हते ना? याविषयी मोठी चर्चा सुरू झाली आहे. व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनींनो, मातांनो… आजचं हे व्यासपीठ आणि कार्यक्रम पाहून मला समाझान आहे की आपण सगळेच जण राजकारण बाजूला ठेऊन जनतेच्या हिताच्या गोष्टी आपण करत आहोत. नाहीतर मराठवाडा मुक्तीदिन साजरा करायचा आणि आपापसात भांडण करायचं. मग निजामाला कशाला घालवलं? नालायकपणे कारभार करून आपणही तसेच वागत राहिलो, तर त्या आणि या राजवटीमध्ये काय फरक राहिला? अपेक्षा एकमेकांकडून असणारच आहेत, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, गुरुवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका विधानाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या या विधानाचा अर्थ लावला जात आहे. पुण्यात एका खासगी दुकानाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्याला माजी मंत्री न म्हणण्याचा उल्लेख केला होता. “मला माजी मंत्री म्हणू नका. दोन-तीन दिवसांत कळेल तुम्हाला“, असं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. त्यामुळे आधी चंद्रकांत पाटील यांचं विधान आणि त्यापाठोपाठ आज मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याच्या शक्याशक्यतेवर चर्चा सुरू झाली आहे.

belgavkar belgaum belgaum

belgaum belgavkar

belgaum belgav

आजी, माजी आणि भावी…! मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानावरून तर्क-वितर्कांना उधाण!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Support belgavkar | Help us continue running the belgavkar.com news by making a voluntary contribution. Please pay an amount (INR) you are comfortable with; UPI Payment : 918892211310 (Bhavesh belgavkar) Google Pay / PhonePe / Paytm