बेळगाव : महत्त्वाकांक्षी सुवर्ण चतुष्कोन योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या तत्कालीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 चा (NH4) समावेश राष्ट्रीय मुद्रीकरण योजनेंतर्गत करण्यात आला आहे. त्यानुसार कोगनोळी ते हिरेबागेवाडी हा बेळगाव जिल्ह्यातील महामार्गाचा पट्टा चार वर्षांसाठी मुद्रीकरण योजनेतून लीजवर देण्यात येणार आहे. हत्तरगी टोलनाका ते महाराष्ट्राची सीमा आणि हत्तरगी ते हिरेबागेवाडी हा एकूण 100 किलोमीटरचा रस्ता मुद्रीकरण योजनेत येणार आहे.
2022 ते 2025 या काळासाठी हा महामार्ग लीजवर देण्यात येणार आहे. यातून देशबांधणीला पैसा उभा राहील, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मुद्रीकरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे टोल वसुली यंत्रणेत सुधारणा होईल, असाही दावा करण्यात आला आहे. केंद्र सरकारने ही योजना जारी केली असून देशातील विविध भागांत ती राबवण्यात येणार आहे. त्यामध्ये बेळगावचाही समावेश आहे. हत्तरगीपासून महाराष्ट्राकडे गेलेला महामार्ग पुंज लॉईड कंपनीने तर हिरेबागेवाडीहून बंगळूरकडे गेलेला महामार्ग आर. एन. शेट्टी कंपनीने बांधला होता.
राष्ट्रीय महामार्गांचा उपयोग संपत्तनिर्माणासाठी (मॉनेटायझेशन) करण्याची ही महत्वाकांक्षी योजना सहा लाख कोटी रुपयांची आहे. या योजनेचे क्रियान्वयन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएएचआय) आणि केंद्रीय मार्ग परिवहन विभागाकडून केली जाणार आहे. ‘टोल ऑपरेट ट्रान्फर’ (टीओटी) या तत्वानुसार ही योजना लागू केली जाईल. पायाभूत सुविधा विश्वस्त निधीचा या योजनेत सक्रीय सहभाग असेल, अशी माहिती देण्यात आली आहे.
खासगीकरण याचा अर्थ सरसकट जमिनीची किंवा आस्थापनांची किंवा मार्गांची विक्री असा नाही. केवळ काही काळापुरती ही आस्थापने किंवा सुविधा खासगी कंपन्यांना उपयोगासाठी तसेच त्यातून पैसा मिळविण्यासाठी हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या सुविधांवर मालकी केंद्र सरकारचीच राहणार आहे. तसेच कालावधी पूर्ण झाल्यानंतर या मालमत्ता केंद्र सरकारला परत मिळणार आहेत, असे महत्वाचे स्पष्टीकरणही केंद्र सरकारने यग्ना संदर्भात दिले आहे.