सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी आणि भारतीयांच्या एकजुटीसाठी केली. 1905 मध्ये टिळकांनी पुण्याबरोबरच बेळगावातही गणेशोत्सवाची सुरुवात केली. गोकुळाष्टमीच्या दिवशी टिळकांनी स्वत: मंडळासाठी खांब रोवत ‘झेंडा चौक’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची (मार्केट) स्थापना केली. आज महाराष्ट्राप्रमाणेच संपूर्ण बेळगावसह सीमा भागातही गणेशोत्सव मोठया उत्साहाने साजरा केला जातो. आज बेळगाव शहरात 400+ सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. बेळगाव शहरातील झेंडा चौक देशातील सर्वात दुसरे जुने गणेशोत्सव मंडळ आहे.
झेंडा गणेशोत्सव मंडळाची सुरुवात 1905 मध्ये बाळ गंगाधर टिळकांनी केली होती. यासाठी टिळक स्वत: बेळगावला आले होते आणि त्यांनी स्वत: गोकुळाष्टमीला खांब रोवून बेळगावात सार्वजनिक गणेशमंडळाची सुरुवात केली. बेळगावात महाराष्ट्राप्रमाणे शिवजयंती आणि गणेशोत्सव महाराष्ट्राप्रमाणेच मोठया उत्साहाने साजरे केले जातात. यामुळे बेळगाव शहर हे सांस्कृतिकदृष्टयाही महाराष्ट्राशी जोडले गेले आहे, याची प्रचिती येते. ‘इवलेसे रोप लाविले दारी, त्याचा वेलू गेला गगनावरी’ या ज्ञानेश्वरांच्या अभंगाप्रमाणेच लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव आजही बेळगावात मोठया संख्येने साजरा केला जातो.
‘1905 मध्ये आमचे आजोबा ज्येष्ठ स्वातंत्र्यसनिक विठ्ठलराव याळगी आणि कर्नाटक केसरी गंगाधरराव देशपांडे यांच्यासह बेळगावातले काही व्यापारी टिळकांना बेळगावला आणण्यासाठी पुण्याला गेले होते. टिळकांचे बेळगावला आगमन झाल्यानंतर त्यांचे बेळगाव रेल्वे स्थानकापासून झेंडा चौकापर्यंत मोठया जल्लोषात मिरवणूक काढून स्वागत केले. तेव्हापासून बेळगावात गणेशोत्सवाची सुरुवात झाली आणि आजही बेळगावात मोठय़ा गुण्यागोविंदाने हा उत्सव साजरा केला जातो, याचा मला अभिमान आहे.’, असे स्वातंत्र्यसनिक विठ्ठलराव याळगी यांनी चौक गणेशोत्सवाची आठवण सांगितली. बेळगावातील झेंडा चौक गणेश मंडळ हे अनेक सामाजिक उपक्रम राबवून एक आदर्श गणेशोत्सव मंडळ म्हणून समोर आले आहे. 100 वर्षाच्या काळात या मंडळाने अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन बेळगावातील इतर मंडळांसमोर एक आदर्श तर उभे केला आहेच त्याशिवाय या मंडळाची आर्थिक उलाढाल कोटयवधींमध्ये झाली आहे. झेंडा चौक मंडळाचे खजिनदार आणि माजी शरीरसौष्ठव खेळाडू अजित सिद्दन्नावर यांनी सांगितले की, 2005 मध्ये आमच्या या मंडळाला 100 वर्षे पूर्ण झाल्यापासून मंडळाने लोकांकडून वर्गणी जमा करण्याचे बंद केले आहे.
दरवर्षी मंडळाच्या ठेवीतून 2.5 लाख रुपये व्याज येते. त्यातूनच आणि रविवार पेठेतील व्यापार्यांच्या वर्गणीतून दरवर्षी हा उत्सव साजरा केला जातो. मंडळाच्या माध्यमातून अनेक गरीब विध्यार्थ्यांना मदत केली जाते. याशिवाय योग्य गरजू आणि गरिबांना आजारी आणि शस्त्रक्रियेसाठीही मदत केली जाते. गेल्या सहा वर्षापासून ‘बेळगाव गणेश श्री’ ही शरीरसौष्ठव स्पर्धा भरवत आहोत. या शिवाय दर वर्षी गणेश दर्शन घेणार्या भक्तांना चहा आणि नाश्त्याची सोयही केली जाते. टिळकांनी लावलेले हे रोपटे आज गगनाला जाऊन भिडले आहे आणि समाजाला दिशा देणारे ठरले आहे.
दडपशाहीचे प्रतिबिंब गणशोत्सवात : बेळगावामध्ये मराठी माणसांवर होत असलेल्या दडपशाहीचे प्रतिबिंब बेळगावमधील गणेशोत्सवात पडले आहे. कर्नाटक सरकारने बेळगावचे नाव बेळगावी करण्याचा घाट घातला आहे. त्याविरोधात यावेळी येळुळर गावातल्या देखाव्यात ‘बेळगावी नको बेळगावच हवे’ या विषयावर देखावा करण्यात आला. भांदूर गल्ली गणेशोत्सव मंडळाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी झुणका भाकर केंद्र सुरू केले आहे. कोकण, कोल्हापूरप्रमाणे बेळगावात प्रत्येक घरात घरगुती गणपती बसतात. त्यात 7, 9 आणि 11 दिवसांच्या गणेशमूर्तीही असतात.