बेळगाव : सौंदत्ती येथील रेणुका यल्लम्मा मंदिर, जोगनभावी मंदिर व मायक्का चिंचली देवस्थान भाविकांसाठी सुरू करावे की नाही...?, याचा निर्णय सोमवारी बेळगाव जिल्हाधिकारी घेणार आहेत. रेणुका मंदिर आणि मायक्का मंदिर खुले केले जावे, अशी भाविक आणि स्थानिक व्यापाऱ्यांकडून मागणी होत असल्याने सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी ही माहिती दिली.
कोरोना व्हायरसची मागील वर्षी पहिली लाट येताच सौंदत्ती यल्लमा मंदिर आणि चिंचली येथील मायक्का मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले. मागील वर्षी 8 जून रोजी राज्यातील सर्व मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यातून ही दोन्ही मंदिरे वगळण्यात आली होती. त्यानंतर दर महिन्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जमावबंदीचा आदेश बजावत भाविकांसाठी दोन्ही मंदिरे बंद ठेवण्यात आली. दरम्यान यावर्षी 1 ते 20 फेब्रुवारी सौंदत्ती यल्लमा मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. केवळ वीस दिवसात वीस लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
मात्र बेळगावात पुन्हा दुसरी लाट आल्यामुळे सौंदत्ती मंदिर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आजवर मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. सौंदत्ती यल्लामा, मायका चिंचली (रायबाग) ही दोन्ही मंदिरे महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश राज्यामध्ये जागृत मानले जातात. त्यासाठी या चारही राज्यातून भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात.
मागील दीड वर्षापासून या दोन्ही मंदिर परिसरातील व्यापार पूर्णपणे ठप्प झालेला आहे. तर भाविकांना देखील देवीचे दर्शन दुर्मिळ ठरले आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणि भाविकांनी मंदिर सुरू केली जावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार तज्ञांचा सल्ला घेऊन ही मंदिरे खुली करावी का? याबाबत सोमवारी चर्चा केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे.