बेळगाव : बेळगाव - खानापूर महामार्गावर भरधाव खडीवाहू टिप्पर टोलनाक्याला धडकून पेटल्याने जळून खाक झाल्याची घटना गणेबैल (ता. खानापूर) येथे आज घडली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघातग्रस्त टिप्पर उत्तमकुमार बापशेट (रा. टिळकवाडी, बेळगाव) यांच्या मालकीचा आहे. सदर खडी भरलेला दहा चाकी टिप्पर घेऊन चालक भरधाव वेगाने रामनगरकडे निघाला असता आज सकाळी 11 च्या सुमारास गणेबैल येथील टोलनाक्याला टिप्परने धडक दिली.
ही धडक इतकी जोराची होती की डिझेल टाकी फुटून आगीचा भडका उडाला आणि क्षणार्धात संपूर्ण टिप्परने पेट घेतला. धडक बसताच प्रसंगावधान राखून चालकाने टिप्पर बाहेर उडी घेतल्यामुळे त्याचा जीव वाचला. सदर घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत टिप्पर जळून खाक झाला होता. खानापूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.
बेळगाव - पणजी राष्ट्रीय महामार्गापैकी झाडशहापूर ते खानापूर या मार्गावरील 90 टक्के काम पूर्णत्वास आले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाल्याने आता उर्वरित कामांनाही गती देण्यात आली आहे. खानापूर ते बेळगाव या दरम्यान गणेबैल या ठिकाणी टोलनाक्याची उभारणी केली जाणार असून टोलनाका उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक वाहनांना टोलमधून सूट देण्यात येणार की पासचे वितरण होणार याबाबत मात्र संभ्रमावस्था आहे.
टोल आकारणीचे स्वरूप आणि दर अद्याप निश्चित करण्यात आलेले नसले तरी टोलनाक्याच्या उभारणीनंतर खानापूर - बेळगाव मार्गावरील प्रवास महागणार हे मात्र निश्चित आहे. गणेबैल, इदलहोंड, निट्टर, प्रभुनगर, देसुर, झाडशहापूर येथील पूल वाहतुकीसाठी यापूर्वीच खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे आता टोल नाक्याच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. इदलहोंड आणि गणेबैल या दोन गावांच्यामध्ये टोलनाक्याची उभारणी केली जात आहे.