बेळगाव : अलारवाड येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी ₹ 2 कोटी 28 लाख रुपये खर्च करून तो प्रकल्प अर्धवट सोडून हलगा येथे प्रकल्प उभा करण्यासाठी नवा आराखडा बनवण्यात आला. याप्रकरणी दाखल याचिकेवरील सुनावणीला महापालिका आयुक्त डॉ. रूद्रेश घाळी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे त्यांना ₹ 5000 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असून पुढील सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचा आदेश बजावला आहे.
अलारवाड येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठीच्या ₹ 2 कोटी 28 लाख रूपयांचा हिशोब आयुक्तांनी द्यावा, असा आदेश उच्च न्यायालयाने बजावला होता. पण, आयुक्तांनी ऑनलाईन पद्धतीने सुनावणीला उपस्थिती दर्शवण्याचा प्रयत्न केला. तो अंगलट आला आहे. सांडपाणी सुरळीतपणे वाहत जाऊन सांडपाणी प्रकल्प उभारणीसाठी अलारवाड जागेची निवड करून भुसंपादन केले आणि अर्धवट कामही केले होते. त्यासाठी 2 कोटी 28 लाख रुपयांचा खर्च केला होता.
मात्र पुन्हा तिबार पिके देणाऱ्या हलगा येथील जमिनीवर सांडपाणी प्रकल्पासाठी भूसंपादन करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे नारायण सावंत यासह पाच जणांनी जनहित याचिका दाखल केली आहे. वकील रविकुमार गोकाककर यांनी मनपच्या कारभाराची माहिती न्यायालयासमोर दिली असून न्यायालयाने मनपा आयुक्तांनी हजर होऊन त्या संदर्भातील माहिती द्यावी. असे सांगितले होते. मात्र आयुक्त सुनावणीला हजर झाले नसल्याने त्यांना दंड बजावण्यात आला आहे.