जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच काश्मिरी पंडितांवर आणि बिगर मुस्लिमांवर झालेल्या हल्ल्यांमागे आयएसआयचे (ISI) सुनियोजित षडयंत्र आहे. काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर अस्थिरता निर्माण करण्यासाठी मोठे षड्यंत्र रचलं गेलं आहे, असं मानलं जातंय. या अंतर्गत सुमारे 200 लोकांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्याची तयारी करण्यात आली होती. लष्कर आणि सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांविरोधात जबरदस्त ऑपरेशन केले जात असूनही, दहशतवादी गटांना पाकिस्तानकडून सतत पाठिंबा मिळत आहे. घुसखोरीच्या माध्यमातून नवीन दहशतवादी पाठवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
गुप्तचर अहवालांनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने अलीकडेच पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) अनेक दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांची भेट घेतली आहे. ही बैठक 21 सप्टेंबर रोजी झाली. भारतीय गुप्तचर संस्थांना आयएसआय आणि दहशतवादी संघटनांमधील गुप्त बैठकांचे अनेक संकेत मिळाले आहेत. हे लक्षात घेऊन सुरक्षा यंत्रणांनी अलर्ट जारी केला आहे. गुप्तचर अहवालांनुसार, आयएसआयने दहशतवादी संघटनांना जम्मू -काश्मीरमध्ये हल्ले तीव्र करण्यास सांगितले आहे. विशेषतः काश्मिरी पंडित आणि बिगर मुस्लिमांना लक्ष्य करण्यास सांगितले आहे. आयएसआयने जम्मू -काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी लॉन्च करण्याचा कट रचला आहे.
यासोबतच टार्गेट किलिंगचे प्रमाण वाढवण्यास सांगितले आहे. षडयंत्रांतर्गत, सामान्य काश्मिरी पंडित, मुस्लिम नसलेले आणि पोलीस, सुरक्षा दल आणि गुप्तचर खात्यात कार्यरत काश्मिरींवर हल्ला करण्यास सांगितले आहे. बिगर काश्मिरी लोक आणि भाजप-आरएसएससोबत जोडलेल्या लोकांनाही निशाणा बनवण्यास सांगितलं आहे. दहशतवाद्यांनी यावेळी हल्ल्यासाठी आपली भूमिका बदलली आहे. दहशतवादी कामगारांना (ओजीडब्ल्यू) उपकरणे आणि माहिती इत्यादी पोहोचवण्यात मदत करणाऱ्यांना या हत्या घडवून आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर दहशतवादी आता पडद्यामागे मदतनीसांच्या भूमिकेत काम करत आहेत. लहान शस्त्रांनी लक्ष्यित हत्या हे दहशतवादी गट आणि पाकिस्तानला वाचवण्याचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय समुदायासमोर दिशाभूल करणारे चित्र सादर करणं, हा यामागचा उद्देश आहे.