बेळगाव : येत्या काही वर्षात बेळगाव शहर 35000 एलईडी दिव्यांनी उजळून निघणार आहे. स्मार्ट सिटी योजनेतून बेळगाव शहरातील सर्व पथदीप बदलून एलईडी दिवे लावले जाणार आहे. यामुळे वीजेची बचत होण्यासह बेळगावच्या सौंदर्यात भर पडणार आहे. ही योजना स्मार्ट सिटीची असली, तरी ती पीपीई तत्वावर राबविली जात आहे. या योजनेसाठी नियुक्त ठेकेदाराला स्वतः आर्थिक गुंतवणूक करावी लागणार आहे. एलईडीमुळे जी वीजबचत होणार आहे, ती बचतीची रक्कम ठेकेदाराला मिळणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी विभागासाठी यासाठी स्वतंत्रपणे निधी खर्च करावा लागणार नाही.
एकदा एलईडी दिवे शहरात लावले की त्याची देखभाल ठेकेदाराकडूनच केली जाणार आहे. त्यामुळे सध्या पथदीपांच्या देखभालीसाठी जो खर्च महापालिकेकडून केला जात आहे, त्याची बचत होणार आहे. स्मार्ट सिटी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या एलईडी योजनेसाठी बंगळूरमधील साऊथलाईन प्रॉपर्टीज नावाच्या कंपनीने हा ठेका घेतला आहे. कंपनीकडून स्मार्ट सिटी विभागाला लेटर ऑफ अँक्सेप्टन्स देण्यात आले आहे. ठेकेदाराकडून शहरात एलईडी दिवे बसविण्याची प्रक्रिया सुरू आहे. 2015 साली महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेचा आराखडा तयार केला, त्यावेळी त्यात एलईडी दिवे बसवण्याची चर्चा झाली होती.