टीम इंडियाचा माजी फलंदाज सुरेश रैनाने त्याच्या ‘Believe’ या आत्मचरित्रातून त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील अनेक मोठे खुलासे केले आहेत. रैनाने भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्याबद्दलही अनेक गोष्टी सांगितल्या होत्या. आता रैनाने त्याच्या लखनऊच्या वसतिगृहातील रॅगिंगची भीषणता सविस्तरपणे सांगितली आहे. लखनऊच्या स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये निवड झाल्यानंतर रैनाला हॉस्टेलमध्ये राहावे लागले. तो आपल्या आत्मचरित्रात म्हणाला, इथे अशी मुलं सिनियर्सचं खास टार्गेट असायची, जी अभ्यासात आणि खेळातही हुशार असायची. सिनियर्स ज्युनियर मुलांना त्यांची वैयक्तिक कामे करायला लावायची. रॅगिंगच्या वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात. कधी त्यांना कोंबडा बनवायचे, तर कधी तोंडावर पाणी फेकायचे.
उन्हाळा असो वा हिवाळा, सिनियर्स त्यांच्या चहाचे मग माझ्या पलंगाखाली ठेवत असत. त्यांचा आदेश असा होता, की सकाळी स्वतः चहा घेण्याआधी मी त्यांना चहा देण्यासाठी त्यांच्या खोलीत यावे. तेव्हा मी फक्त 11-12 वर्षांचा होतो. पहाटे साडेचार वाजता मी अशा गोष्टी करायचो. आपल्या आत्मचरित्रात सुरेश रैना म्हणतो, सिनियर्स ज्युनियर मुलांना विविध प्रकारे त्रास देत असत. ते त्यांचे घाणेरडे कपडे आमच्या खोलीत किंवा पलंगावर फेकून देत असत आणि त्यांचे कपडे धुणे आणि त्यांच्याकडे पोहोचवणे ही माझी जबाबदारी होती. सिनियर्स मला त्रास देण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असत. कधीतरी पहाटे साडेतीन वाजता बर्फाचं थंड पाणी ओतत असत, किंवा मध्यरात्री लॉन कापून घेत असत.
सुरेश रैनाने त्याच्या चरित्रात एक भयानक किस्सा सांगितला आहे. एकदा मी एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी आग्र्याला जात होतो. सोबत सर्व सिनियर्सही होते. अनेकांना जागा नव्हत्या, म्हणून आम्ही दरवाज्याजवळ बसलो. सिनियर्स आम्हाला त्रास देण्यासाठी तेथे आले आणि दिवे गेल्यावर त्यांनी आमच्यावर चप्पल व बूट फेकण्यास सुरुवात केली. इतक्यात एक उंच मुलगा माझ्यावर बसला आणि माझ्या चेहऱ्यावर लघवी करू लागला. हॉस्टेलच्या दिवसात ज्या लोकांनी माझे आयुष्य नरक बनवले, ते मला अनेकदा सापडले. आता त्यांना माझ्याशी बोलून आनंद होतोय, पण मला वाटतं त्यांनी माझ्याशी जे केलं ते ते किती सहज विसरले. रॅगिंग ही एक वाईट गोष्ट आहे, की ती संपवणे खूप आवश्यक आहे, जर तुम्ही त्याचा बळी असाल, तर स्वत:ला गुन्हेगार समजणे बंद करा आणि त्याविरोधात जोरदार आवाज उठवा, असेही रैनाने आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे. सुरेश रैनाने श्रीलंकेत वनडे पदार्पण केले. रैनाने आपल्या कारकिर्दीत भारतासाठी 226 एकदिवसीय सामने खेळले आणि 5615 धावा केल्या. यासोबतच त्याने 36 विकेट्सही घेतल्या.