बेळगाव : भाजपकडे असणाऱ्या मतांवर दोन जागा जिंकणे त्यांना अशक्य आहे. त्यांच्या पक्षातच गोंधळ आहे. आमदार रमेश जारकीहोळी यांनी महांतेश कवटगीमठ अथवा लखन जारकीहोळी यांना निवडून आणावे. दोघांना निवडून आणण्याची क्षमता त्यांच्यात नाही, असा टोला केपीसीसी कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी यांनी लगावला. येथील काँग्रेस भवनमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते.
ते म्हणाले, आमदार रमेश जारकीहोळींकडून आपल्या पक्षाला शहाणपण सांगण्याची गरज नाही. त्यांच्या पक्षामध्येच बंडखोरांमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यांनी आपल्या पक्षाचा विचार करावा. लखन जारकीहोळी व काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. लखन जारकीहोळी व भाजपविरोधात आपला लढा आहे. भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या व्यासपीठावरूनच अपक्ष उमेदवाराचाही प्रचार करण्यात आला आहे. त्यामुळे रमेश जारकीहोळी यांनी आपल्या पक्षातील गोंधळ दूर करावा, असा सल्लाही आमदार सतीश जारकीहोळी यांनी दिला. कॉंग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी यांनी उमेदवारी दाखल केली असून त्यांच्या प्रचारार्थ केपीसीसीचे कार्याध्यक्ष आमदार सतीश जारकीहोळी आघाडीवर आहेत. त्यांना बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह जिल्ह्यातील अन्य नेत्यांची साथ मिळत आहे. मात्र, प्रचाराची सूत्रे आमदार सतीश जारकीहोळी यांच्याकडेच आहेत.
जिल्ह्यातील राजकारणात प्रभावी असणाऱ्या जारकीहोळी कुटुंबातील चार बंधू या निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. त्याचा फायदा कुणाला होणार व फटका कुणाला बसणार हे निवडणूक निकालादिवशीच स्पष्ट होणार आहे. भाजपतर्फे विद्यमान सदस्य महांतेश कवटगीमठ पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत. त्यांच्या पाठीशी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी आणि अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी आहेत. भाजप आणि कॉंग्रेसच्या उमेदवारांत काटे की टक्कर होत असताना अपक्ष उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. या निवडणुकीत जारकीहोळी बंधूंची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकीकडे कवटगीमठ यांना निवडून आणण्याचे प्रतिज्ञा करतानाच कॉंग्रेस उमेदवाराचा पराभव करणे आपले ध्येय असल्याचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी म्हटले आहे. यामुळे साहजिकच त्यांची दुसरी पसंती बंधू लखन यांच्यासाठी आहे.