बेळगाव ता. खानापूर : शॉर्टसर्किटमुळे आठ एकरांतील उसाचे पीक जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी गणेबैलमध्ये (ता. खानापूर) घडली. यात सहा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. खानापूर अग्निशामक दलाने घटनास्थळी वेळीच धाव घेऊन आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला. याबाबत अग्निशामक दलाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, गणेबैलहून काटगाळीला जाणाऱ्या रस्त्याशेजारी हे उसाचे क्षेत्र आहे.
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास पिकाजवळून गेलेल्या वीजवाहिन्या एकमेकाला चिकटल्याने ठिणगी पडून फडाला आग लागली. काही क्षणातच आगीने संपूर्ण क्षेत्र आपल्या कवेत घेतले. शेतकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, उन्हात आगीच्या ज्वाळा आटोक्यात आणणे त्यांना शक्य झाले नाही. तात्काळ अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाला आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले. तत्पूर्वी आठ एकरातील पिक जळून खाक झाले होते. कृष्णा कल्लाप्पा गेचपतकर व मोतीराम निंगाप्पा गेचपतकर यांचे प्रत्येकी दोन एकर तर लक्ष्मण मोरे, रामचंद्र मोरे, मारुती मोरे व नागेश मोरे यांचे प्रत्येकी एक एकर उसाचे क्षेत्र आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात शेतकऱ्यांचे अंदाजे सहा लाखांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली. याची नोंद खानापूर अग्निशामक दलात झाली आहे.