बेळगाव ता. निपाणी : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर निपाणीजवळ तवंदी घाट उतारावरील धोकादायक दुसऱ्या वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर उलटून झालेल्या अपघातात वाहनाचे दोन्ही चालक जागीच ठार झाले. हा अपघात रविवारी सकाळी अकराच्या सुमारास झाला. महावीर बसवराज जैनर (वय 28, रा. के.बी. पटीयाळ, ता. बैलहोंगल, बेळगाव) व विनायक पत्र्यापा कुंभार (वय 22 रा. केगदाळ, ता. सौंदत्ती, बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत.
हुबळी येथील व्हीआरएल कंपनीचा कंटेनर हबळी येथून गुजरातकडे मिरची भरून जात होता. तवंदी घाट उतारावरील धोकादायक वळणावर चालक महावीर याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर दुभाजकावर उभारण्यात आलेल्या लोखंडी पट्टीला सुमारे शंभर फूट घासत जाऊन विरुद्ध दिशेला उलटला. त्यात महावीर व विनायक हे दोघेही चालक जागीच ठार झाले. महावीरचा मृतदेह वाहनात अडकून पडला होता, तर विनायकचा मृतदेह बाहेर फेकल्याने घाटात पडला होता. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.