पहाटे घडलेल्या भीषण अपघातात वर्ध्यातील सावंगी येथील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर काळानं घाला घातला. या अपघातात सातही जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात कारमधील कुणाचाही जीव वाचू शकला नाही. देवळी येथून वर्धेला येत असताना सेलसुरा जवळ अपघात झाला आहे. वाहनावरून नियंत्रण सुटल्याने सेलसुरा जवळील नदीच्या पुलावरून खाली वाहन खाली कोसळलंय. जवळपास 40 फूट पुलावरून चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला. भीषण अपघातातील सर्व मृतक 25 ते 35 वयोगटातील असल्याची माहिती आहे. रात्री एक वाजताच्या जवळपास अपघात झाला असून पहाटे चार वाजेपर्यंत मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु होते.
सोमवारी रात्री आणखी एक भीषण अपघाताची घटना समोर आली असून आता रस्ते अपघातातील बळींचा आकडा आणखी वाढला आहे. वर्ध्यातील कार अपघातात सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून आता गेल्या 48 तासांत तब्बल 15 जणांचा मृ्त्यू झाला आहे. सर्व सातही मेडिकलच्या विद्यार्थ्यांना अपघाताची बातमी ऐकून सगळ्यांनाच हादरा बसला आहे. यामध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले याचाही समावेश आहे. सातही विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून यामध्ये महाराष्ट्रातील एका भाजप आमदाराच्या मुलाचाही मृतांमध्ये समावेश आहे. आविष्कार रहांगडाले असं मृत विद्यार्थ्याचं नाव असून तो तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा आहे. आविष्कार मेडिकलच्या पहिल्याच वर्षाला होता. कॉलेजच्या मित्रांसोबत बर्थडे पार्टीला गेलेल्या आविष्कारवरही काळानं घाला घातला आहे.
नदीच्या पुलावर असलेला सुरक्षा कठडा तोडून कार थेट खाली कोसळली. तब्बल चाळीस फूट खोल कार थेट कोसळून कारचा चक्काचूर झाला. यात कारमधील विद्यार्थ्यांना जबर मार बसला.हॉस्टेलला दहा वाजेपर्यंत येणं अपेक्षित होते. पण विद्यार्थी आले नव्हते. म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनाही कळवण्यात आलं होतं. तेव्हा कुटुंबीयांनाही विद्यार्थ्यांनी आपण वाढदिवस साजरा करायला जात असल्याची माहिती दिली होती. पण वाटेतच मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कारचा अपघात झाला.
नितेश सिंग, 2015 इंटर्न एमबीएएस
विवेक नंदन 2018, एमबीएबीएस फायनल पार्ट1
प्रत्युश सिंग, 2017, एमबीबीएस फायनल पार्ट 2
शुभम जयस्वाल, 2017 एमबीबीएस फायनल पार्ट 2
पवन शक्ती 2020 एमबीबीएस फायनल पार्ट 1
सातपैकी एक विद्यार्थी हा इंटर्न होता. दोन फायनल इयरचे विद्यार्थी होते. तर दोन मधल्या वर्षांचे विद्यार्थी होते. गाडी चालवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव नीरज सिंह होतं, अशी माहिती अभ्यूदय मेघे यांनी दिली आहे. नीरजचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं हा भीषण अपघात घडल्याचं सांगितलं जातंय.या अपघातात ठार झालेल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची ओळख पटली असल्याचीही माहिती सावंगी मेडिकल कॉलेजच्या ओएसडींनी दिली आहे. हे सर्व विद्यार्थी एमबीबीएसचं शिक्षण घेत होते. आपला मुलगा भविष्यात डॉक्टर होणार आहे, असं स्वप्न सर्वच विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाहिलं होतं. मात्र सोमवारच्या काळरात्री या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.