बेळगाव : बेळगाव ते संकेश्वरपर्यंतच्या सहापदरी कामकाजाला लवकरच प्रारंभ होणार आहे. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे (NH4) सहापदरीकरण होणार आहे. बेळगाव ते संकेश्वरपर्यंतच्या महामार्ग सहापदरीकरणाच्या कामाचा ठेका अशोक बिल्डकॉन कंपनीला मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून या कामाची वर्क ऑर्डरही सदर कंपनीला देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या भारतमाला योजनेतून राष्ट्रीय महामार्गाचे (NH4) सहापदरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महामार्ग प्राधिकरणकडून राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत सर्वात कमी रकमेची निविदा अशोक बिल्डकॉन कंपनीने दाखल केली होती. त्यामुळे या कंपनीलाच या कामाचा ठेका मिळण्याची शक्यता होती. त्यानुसार आता वर्क ऑर्डर देवून प्राधिकरणने ही औपचारिकता पूर्ण केली आहे. 829 कोटी 49 लाख रुपयांना हा ठेका कंपनीने घेतला आहे.
बेळगाव ते संकेश्वर (ता. हुक्केरी) महामार्ग बायपासपर्यंतचे सहापदरीकरणाचे काम या कंपनीकडून केले जाणार आहे. हे अंतर सुमारे 40 किमी इतके असून सध्या हा महामार्ग चौपदरी आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 हा रस्ता बेंगळूर ते पुणे या शहरांना जोडला गेला आहे. देशातील हा एक महत्त्वाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. यापूर्वी चारपदरी रस्ता करण्यात आला होता. मात्र वाहनांची संख्या वाढत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पाऊल उचलले आहे. सहापदरीकरणानंतर या महामार्गावरील प्रवास आणखी सुकर होणार आहे. भारतमाला योजनेतून देशातील अनेक महामार्गांची सुधारणा केली जात आहे. नव्या महामार्गांची निर्मिती केली जात आहे. याच योजनेतून बेळगावात रिंगरोडची निर्मिती केली जाणार आहे.
शिवाय भारतमाला योजनेतून बेळगाव-हुनगुंद असा इकॉनॉमिक कॉरिडॉरही तयार केला जाणार आहे राष्ट्रीय महामार्गाच्या बेळगाव धारवाड विभागाचे कामही अशोक बिल्डकॉन कंपनीकडेच आहे. हालगा ते खानापूर या रस्त्याच्या सुधारणेचे कामही याच कंपनीकडून केले जात आहे अडीच वर्षात कंपनीला हे काम पूर्ण करावे लागणार आहे. शिवाय 10 वर्षे या महामार्गाच्या देखभालीची जबाबदारीही कंपनीकडेच असेल. या सहा पदरीकरणाच्या कामासाठी भूसंपादनाची कार्यवाही 2021 मध्ये सुरु झाली होती. ती प्रक्रिया पूर्ण होत असतानाच आता ठेकेदार नियुक्तीही झाली आहे. या रस्त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी यापूर्वी नोटिफिकेशन देण्यात आले होते. त्यानुसार आता सर्व्हे करण्यात आला आहे. तसेच जागाही कब्जात घेतली आहे. आता अशोका बिल्डकॉन कंपनीला हे कंत्राट दिले आहे. त्यामुळे लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा सुवर्ण चतुष्कोन योजनेतून करण्यात आली आहे. 2004 साली हे काम पूर्ण होऊन त्याचे लोकार्पणही करण्यात आले. देशातील महत्वाच्या राष्ट्रीय महामार्गांमध्ये या महामार्गाचा समावेश आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच या महामार्गाचे सहापदरीकरण करण्यात येत आहे.