बेळगाव : आषाढी वारीसाठी आळंदी-पंढरपूर प्रवासासाठी चिकोडी तालुक्यातील अंकली येथून माऊलींच्या मानाचे अश्व शुद्ध दशमीला, शुक्रवारी (10 जुन) शितोळे सरकार राजवाड्यातून प्रस्थान करणार असल्याची माहिती श्रीमंत उर्जितसिंहराजे शितोळे सरकार यांनी दिली. वारीचे 189 वे वर्ष आहे. याबाबत श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार म्हणाले, 10 जुनला शितोळे सरकार राजवाड्यातून सकाळी अश्वाचे प्रस्थान होईल. सकाळी मानाच्या दिंडीचे आगमन आहे. अंबाबाई मंदिरात पूजन, आरती, जरीपटक्याचे पूजन, जरीपटका अश्वस्वाराच्या स्वाधीन करण्यात येईल. दोन्ही अश्वांसह लवाजमा असलेल्या वाहनाचेही पूजन होईल.
आरतीनंतर अश्व व लवाजमा दिंडीसह मार्गस्थ होईल. ठरलेल्या मार्गावरून अश्वांचे वेशीकडे प्रस्थान होईल. दुपारी 12 वाजता अश्वांचा प्रवास सुरू होईल. पहिला मुक्काम शुक्रवारी 10 रोजी मिरज, दुसरा 11 रोजी सांगलीवाडी राममंदिर, 12 रोजी इस्लामपूर पेठ नाका, 13 रोजी वहागाव, 14 ला भरतगाव, 15 ला भुईंज, 16 ला सारोळा, 17 ला शिंदेवाडी, 18 व 19 रोजी पुण्यात मुक्काम आहे. सोमवारी, 20 रोजी आळंदीत अश्व पोचेल. आळंदीत आगमनानंतर दिंडीमालक बाळासाहेब आरफळकर-पवार व ज्ञानेश्वर माऊली देवस्थानच्या वतीने स्वागत होईल. अश्व चालक व व्यवस्थापक म्हणून तुकाराम कोळी काम पाहतील. 11 दिवसांचा पायी प्रवास अंकली-आळंदी 315 किमीचा प्रवास अश्वांसह स्वार आणि पथकाचा पायी 11 दिवसांचा असतो. रोज 30 किमीचा प्रवासाचा टप्पा पूर्ण केला जातो.