बेळगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेले लखन जारकीहोळी यांच्या पाठिंब्याची भारतीय जनता पक्षाला गरज नाही, असे वन आणि अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांनी स्पष्ट केले. शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाला कोणाच्याही पाठिंब्याची गरज नाही. बेळगाव जिल्ह्यात आम्ही भाजपचे 13 जण आमदार आहोत.
वायव्य कर्नाटक पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी आम्ही सर्वजण पक्षाचे कार्य करत असताना आम्हाला इतर कोणाच्या पाठिंब्याची गरजच कशाला हवी? लखन जारकीहोळी हे स्वतः आमच्या पक्षाच्या प्रचाराला येऊ देत, येणार्यांना आम्ही नाही म्हणणार नाही, लखन जारकीहोळी यांच्या पाठिंब्यामुळे भाजपला कांहींही फरक पडणार नाही. ते आमच्यात पक्षात आलेले नाहीत. त्यामुळे अधिक चर्चा करण्यात अर्थ नाही, असे मंत्री उमेश कत्ती म्हणाले.