कोल्हापूर : बेळगावसह इतर सीमाभागात महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व होते. पण मागील काही वर्षांत समितीचा दबदबा कमी झाल्याचे चित्र आहे. मागीलवर्षी बेळगाव महापालिकेची सत्ता हातातून गेली. त्यानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाल्याचे दिसत आहे. एकीकरण समिती विस्कळीत होत आहे. त्यामुळे बेळगाव किंवा सीमा भागातील निवडणुका ह्या शिवसेना म्हणून लढण्याचा प्रयत्न राहील, असं सूचक वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
कोल्हापूरात शनिवारी एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राऊतांची भेट घेतली. या भेटीबाबत माध्यमांशी बोलताना राऊत यांनी हे वक्तव्य केलं आहे. एकीकरण समिती ज्यापध्दतीने विस्कळीत होत आहे, त्यामुळे त्याभागातील मराठी माणसाची एकजूट ही अडचणीत असल्याचा राऊत म्हणाले. एकजूट नसल्याने त्याचा फटका फक्त बेळगाव नाही तर सातारा, सांगली, कोल्हापूरमधील सीमाभागातही अडचणी निर्माण होत आहेत. यापुढे आम्ही तिकडे येऊ ते शिवसेना म्हणून येऊ. बेळगाव किंवा सीमा भागातील निवडणुका ह्या शिवसेना म्हणून लढण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं राऊतांनी स्पष्ट केलं.
काँग्रेस-राष्ट्रवादीला ठणकावलं : आता कोल्हापूरमध्ये एका-दोघांचं ठरलंय असं चालणार नाही. महाविकास आघाडी म्हणूनच ठरलं पाहिजे. नाहीतर तुमच्याशिवाय आम्ही ठरवू आणि आमचा निर्णय घेऊ, असा शब्दांत राऊत यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांना ठणकावलं आहे. त्यांचा रोख गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे असल्याची चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी रविवारी कोल्हापूरात शाहू छत्रपती यांची भेट घेतली. न्यू पॅलेसमध्ये या दोघांची भेट झाली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून शाहू छत्रपतींशी बोलल्याची माहिती राऊतांनी दिली. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचेही राऊतांनी स्पष्ट केलं.