बेळगाव : शिवाजी गल्ली गौंडवाड सामाजिक कार्यकर्ते कै. सतीश राजेंद्र पाटील यांचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी गावातील युवकांनी एकत्र येऊन सतीश पाटील सामजिक संघटनेची स्थापना केली आहे. गौंडवाड येथे जमिनीच्या वादातून सतीश पाटील यांचा भैरवनाथ देवस्थान समोरील दीपस्तंभासमोर खून करण्यात आला होता. यापूर्वीही पाटील यांच्यावर पाच ते सहा वेळा जीवे मारण्याच्या प्रयत्न करण्यात आला होता. परंतु सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, कला, क्रीडा, सहकार, कृषी आणि यासह सर्वच क्षेत्रात समाजाच्या कल्याणासाठी अनेक वेळोवेळी मदत करून जनतेची सेवा केली होती. कौटुंबिक जीवनात येणाऱ्या अडचणी, समस्यांचे निवारण करून जनतेला मार्गदर्शन करणारे लढवय्या व्यक्तिमत्त्व होते.
विद्यार्थ्यांना जीवनात परिपक्व आणि यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करत होते. विद्यार्थी आणि तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी त्याचे विविध प्रकारचे विपरीत दृष्य परिणाम याची वेळोवेळी जाणीव करून देऊन सुसंस्कारीत समाज घडविण्यासाठी सतीश पाटील हे समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यामुळे त्यांच्या विचारसरणीचा समाजाला लाभ व्हावा आणि सामाजिक बांधिलकी जपून नव्या पिढीने पाटील यांचे समाजसेवेचे व्रत हाती घेऊन समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रत्येक युवकांनी पुढे यावे.
सतीश पाटील यांनी जे विचार समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन कार्य केले. ते कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेला तो विचार पुढे घेऊन जाऊन प्रत्येकांनी दूरदृष्टी ठेवून कार्य करायला हवे. समाजाला दिशा देण्याचे कार्य युवकांनी करणे अत्यंत गरजेचे आहे, ते करण्यासाठी समाजसेवक पाटील यांच्या नावाने संघटना काढून गोरगरिबांची सेवा करावी. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.