नव्या कामगार कायद्यानुसार पीएफ (PF) आणि ग्रॅच्युटी (Gratuity) सारख्या रिटायरमेंट बेनिफिटमध्ये (Retirement Benefits) वाढ होईल. याशिवाय साप्ताहिक सुट्टी देखील दोनवरुन तीन होतील. नव्या कामगार कायद्यानुसार कर्मचाऱ्यांनी एखाद्या कंपनीतून नोकरी सोडल्यानंतर दोनच दिवसात त्याला संपूर्ण पगार आणि फायनल सेटलमेंट केली जाईल. त्यामुळे राजीनामा दिल्यानंतर आता दोन-दोन महिने कर्मचाऱ्याला थांबावं लागणार नाही. सध्या नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्याला कंपनीकडून मिळणाऱ्या फूल अँड फायनल सेटमेंटसाठी सरासरी 45 दिवस वाट पाहावी लागते. पण नव्या कायद्यात हा वेळ थेट दोन दिवसांवर येणार आहे.
नव्या कायद्यामधील तरतुदीनुसार फुल अँड फायनल सेटलमेंटच्या कायद्यात कर्मचाऱ्यानं नोकरी सोडणं, राजीनामा, कर्मचारी कपात या सर्व बाबतीत कर्मचाऱ्यांना दोनच दिवसात कंपन्यांना कर्मचाऱ्याचं सर्व देणं पूर्ण करावं लागणार आहे. नव्या कामगार कायद्यात इन हँड सॅलरी कमी होणार आहे. तर कामाचे तास वाढणार आहेत. नवा कायदा लेबर कोड वेज (Wage), सोशल सिक्युरिटी (Social Security), इंडस्ट्रियन रिलेशन (Industrial Relations) आणि ऑक्युपेशन सेफ्टीशी (Occupational Safety) निगडीत आहेत. सरकारनं या चार लेबर कोडचा ड्राफ्ट फेब्रुवारी 2021 मध्येच तयार केला होता. आतापर्यंत २३ राज्यांनी नव्या कायद्याची प्री-पब्लिश्ड ड्राफ्टची अंमतबजावणी याआधीच सुरू केली आहे. पण याची सर्वच राज्यांनी अंमलबजावणी करावी असा केंद्राचा मानस आहे. कामाच्या तासांबाबत नव्या कायद्यात मोठा बदल करण्यात आला आहे.
नव्या कायद्यानुसार आठवड्यातून चार दिवस काम आणि तीन दिवस सु्ट्टी असा प्रस्ताव देण्यात आला आहे. पण याच वेळी कामाच्या तासांमध्ये मात्र वाढ करण्यात आली आहे. जर नवा कायदा लागू झाला तर दररोज कर्मचाऱ्यांना 12 तास काम करावं लागेल. म्हणजेच कर्मचाऱ्यांना आठवड्याचे 48 तास भरावे लागतील तेव्हा तीन दिवस सुटीचा लाभ प्राप्त करता येईल. यासोबतच कर्मचाऱ्यांचं PF चं योगदान वाढविण्यात येणार आहे. नव्या प्रस्तावानुसार बेसिक सॅलरीचा अर्धा वाटा थेट पीएफमध्ये जमा होणार आहे. त्यामुळे इन हँड सॅलरी कमी होणार आहे. पण निवृत्तीवेळी कर्मचाऱ्याला याचा मोठा फायदा मिळू शकेल. जेणेकरुन निवृत्तीवयात व्यक्तीची आर्थिक गरज पूर्ण होईल. खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही बाब खूप महत्वाची ठरू शकते. कारण खासगी क्षेत्रात निवृत्तीनंतर कोणत्याही पेन्शनची सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे पीएफचं योगदान वाढवलं तर निवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला मोठा फायदा मिळू शकतो.