बेळगाव : सफाई कर्मचार्यांकडे सरकारचे आजपर्यंत दुर्लक्ष झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही सफाईचे काम करत असताना आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. आम्हाला कायमस्वरुपी सामावून घ्यावे यासाठी अनेकवेळा आंदोलने केली. मात्र आजपर्यंत त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे 1 जुलैपासून काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातील सफाई कर्मचार्यांनी घेतला असून या आंदोलनामध्ये दक्षिण भागातील कर्मचारीही भाग घेणार आहेत.
आनंदवाडी-शहापूर येथील रमाबाई आंबेडकर भवनमध्ये मंगळवारी बैठक झाली. याबैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष दीपक वाघेला होते. बेळगावसह राज्यातील 30 हून अधिक जिल्ह्यातील कर्मचारी हे काम करत आहेत. मात्र अद्याप नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेण्यात आले नाही. त्यामुळे आम्हाला कोणत्याच सोयी-सुविधा नाहीत. याबाबत सरकारकडे पाठपुरावा केला. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. सफाई कर्मचारी विविध समस्यांना तोंड देत आहेत. वेतन बर्याचवेळा दोन-तीन महिने दिले जात नाही. त्यामुळे कुटुंबांवर उपासमारीची वेळ येत आहे. तेव्हा कंत्राटपद्धत रद्द करावी, अशी मागणीही या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला सफाई कर्मचारी समितीचे विजय निरगट्टी, शन्मुख आदीआंद्र, मालती सक्सेना, बळ्ळारी, मुनीस्वामी भंडारी आदी उपस्थित होते.