मुलगा हा वंशाचा दिवा असतो. त्यामुळे मूल जन्माला येणार असेल, तर तो मुलगाच हवा असं आजही समाजातील काही घटकांना वाटतं. जोवर मुलगा होत नाही, तोपर्यंत मुलांना जन्म देत राहणारे अनेक आई-वडील असतात. आग्र्यामध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली आहे. रिक्षा चालवणाऱ्या एकानं केवळ मुलगा व्हावा म्हणून तीन मुलींनंतर अजून एक चान्स घेतला. इतकंच नाही तर आता त्याच्यावर पश्चात्तापाची वेळ आली आहे. कारण त्याच्या बायकोनं एकाचवेळी चार अपत्यांना जन्म दिला आहे. त्यापैकी तीन मुली, तर एक मुलगा आहे. पश्चात्तापाची वेळ अशासाठी की आता सात मुलांचं पालनपोषण करण्याची जबाबदारी या कुटुंबावर आली आहे.
सोशल मीडियावर सध्या आग्र्यातील एकाचवेळी जन्मलेल्या चार मुलांची भरपूर चर्चा आहे. आग्र्यामधील एत्माद्दौला येथील प्रकाश नगरमध्ये राहणारे मनोज कुमार हे रिक्षा चालवतात. त्यांना तीन मुली आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांची गरोदर पत्नी खुशबू हिला रामबाग येथील ट्रान्स यमुना कॉलनीतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथं तिनं एकाचवेळी चार बाळांना जन्म दिला. ही प्रसूती अवघड होती. मात्र आता आई आणि बाळं सुरक्षित आहेत. या चार मुलांपैकी तीन मुली तर एक मुलगा आहे.
मनोज कुमार यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं आता या सात मुलांची जबाबदारी कशी निभावणार अशी चिंता त्यांना लागून राहिली आहे. सध्या रुग्णालयात एका बाळाचा दिवसाचा खर्च 6 हजार रुपये येतो आहे. त्यामुळे चारही अपत्यांसाठी दिवसाला 24000 रुपये खर्च होत आहेत. आतापर्यंतचा खर्च मनोज कुमार यांनी उधारी घेऊन भागवला आहे. मात्र अजूनही बाळांना दोन ते तीन दिवस रुग्णालयात ठेवावं लागणार आहे. त्या खर्चाची सोय कशी करायची असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. रुग्णालयाच्या संचालकांनी मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र सध्या मनोज कुमार यांना पैशांची आवश्यकता आहे. जर कोणी मदत करण्यासाठी इच्छुक असेल, तर त्यांनी मनोज कुमार यांच्याशी 9536628735 या क्रमांकावर संपर्क साधावा.