उदयपूरमध्ये शिवणकाम व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्यानंतर कर्नाटकचे माजी मंत्री के एस ईश्वरप्पा यांनी संताप व्यक्त केला आहे. या हल्लेखोरांची हत्या केली पाहिजे किंवा त्यांना योग्य शिक्षा देत धडा शिकवला पाहिजे असं मत त्यांनी माडलं आहे. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नूपुर शर्मा यांचं समर्थन करणाऱ्या शिवणकाम व्यावसायिकाची राजस्थानमध्ये हत्या करण्यात आली. उदयपूरमध्ये त्याच्या दुकानात घुसून हल्लेखोरांनी तलवारीने वार केले आणि या हल्ल्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला. कन्हैयालाल तेली असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांचे उदयपूरमधील धनमंडी येथे कपडे शिवण्याचं दुकान आहे. मंगळवारी दुपारी दुचाकीवरून दोघे जण आले आणि कापड मोजमापाच्या बहाण्याने त्यांनी दुकानात प्रवेश केला.
दुकानात आल्यावर त्यांनी कन्हैयालालवर तलवारीने सपासप वार केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. एका हल्लेखोराचे नाव रियाज असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याने वार केले आणि दुसऱ्या तरुणाने मोबाइलवर या घटनेचे चित्रीकरण केले, असं पोलिसांनी सांगितलं. हल्लेखोरांनी हत्येचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आणखी एका व्हिडीओतून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच धमकी दिली. मोदींना धमकावणाऱ्या व्हिडीओसंबंधी बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की, “कोणताही राष्ट्रभक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची हत्या करण्यासंबंधी वक्तव्य केल्यानंतरही ती व्यक्ती अद्याप देशात आहे हे खपवून घेणार नाही”. पुढे बोलताना ते म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात शांतता राहावी असं म्हणतील. पण याचा अर्थ हल्लेखोरांची सुरक्षा करा असा होत नाही”.
राजस्थानचे कॅबिनेट मंत्री प्रताप सिंह यांनी चार दिवसांमध्ये हल्लेखोरांना फासावर लटकवलं पाहिजे अशी मागणी केली आहे. “कालपासून माझं रक्त खवळलं आहे. त्यांना तात्काळ मारुन टाकलं पाहिजे. चार दिवसात त्यांना फासावर लटकवा,” असं ते म्हणाले आहेत.तपास NIA च्या हाती, सर्व बाजू पडताळणारया घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. या प्रकरणात कोणती संस्था सहभागी होती का याचा तपास केला जाणार असून आंतरराष्ट्रीय संबंध होते का याचीही पडताळणी होईल अशी माहिती अमित शाह यांनी दिली आहे.
या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उदयपूर शहरात तणाव निर्माण झाला आहे. स्थानिकांनी आंदोलन करून रस्त्यावर जाळपोळ सुरू केली आहे. या प्रकरणानंतर राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हवासिंह घुमारिया यांनी 600 पोलिसांची अतिरिक्त कुमक उदयपूरमध्ये पाठवली आहे. मुख्यमंत्र्यांचे शांततेचे आवाहन: मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केलं आहे. हल्लेखोरांना कठोर शिक्षा केली जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिले असून हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल न करण्याचंही आवाहन केलं आहे.