बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 31 जुलै रोजी 'मन की बात' या कार्यक्रमांतर्गत जनतेशी संवाद साधणार आहेत. मन की बात कार्यक्रमासाठी नवीन विषय व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांनी मन की बात या कार्यक्रमामध्ये सीमाप्रश्नाच्या सोडविण्याची मागणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील विविध विषयांवर आपली मते मांडतात. तसेच आतापर्यंत मन की बातमध्ये मांडण्यात आलेल्या समस्यांबाबत तातडीने कारवाई करण्यात आल्याचे दिसून आले आहे.
31 जुलै 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या नवीन विषयासाठी सूचना व अभिप्राय मागवले जात आहेत. त्यामुळे आसाम-मेघालय व आसाम-अरुणाचल प्रदेश यांच्यामधील सीमावाद सोडविण्यास जशी गती मिळाली आहे, त्याप्रमाणेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नही लवकरात लवकर सोडवला जावा यासाठी मराठी भाषिकांनी 1800117800 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून 1 मिनिटांचा कॉल रेकॉर्ड करावा. तसेच सीमाप्रश्न तात्काळ सोडविण्याची मागणी करावी, असे आवाहन केले आहे. मन की बात यात सीमाप्रश्नाबाबत चर्चा व्हावी यासाठी युवकांनी शुक्रवारपासून टोल फ्री क्रमांकावर आपला अभिप्राय नोंदविण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे इतर लोकांनीही आपला अभिप्राय नोंदवावा, असे मत व्यक्त होऊ लागले आहे.