महाराष्ट्र : शिंदे आणि भाजप सरकार स्थापन होऊन महिना उलटला तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. पण अखेर आता उद्या मंगळवारी मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहुर्त मिळाला आहे. मंगळवारी सकाळी शिंदे गटातील आणि भाजपमधील नेत्यांनी शपथ दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ज्या आमदारांना संधी मिळणार आहे, ते मुंबईला रवाना झाले आहे. अहमदनगरमधून राधाकृष्ण विखे पाटील आणि औरंगाबादेतून संजय शिरसाट मुंबईला निघाले आहे. विधानभवनातील हॉलमध्ये नव्या मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. भाजप आणि शिंदे गटातील पहिल्या फळीतले नेते शपथ घेणार आहे. त्यामुळे भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील हे मुंबईला रवाना झाले आहे. तर दुसरीकडे, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट हे सुद्धा तातडीने मुंबईला रवाना झाले आहे.
गेल्या महिन्याभरापासून मंत्रिमंडळाचा विस्तार रखडल्यामुळे विरोधकांनी शिंदे सरकारवर टीकेची झोड उठवली होती. अखेरीस नुकतीच दिल्लीवारी करून परतलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी सकाळी विस्तार होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराची संभाव्य यादी समोर आली आहे. भाजपकडून चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे, बबनराव लोणीकर यांची मंत्रिपदी वर्णी लागणार आहे.
तर शिंदे गटातून शंभूराजे देसाई, संजय शिरसाट, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, उदय सामंत, दीपक केसरकर यांची नावं समोर आली आहे. जे शिवसेनेमध्ये मंत्री होते त्यांनाच मंत्रिपद दिले जात आहे. दरम्यान, मंत्रिमंडळात स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना मंत्रिमंडळामध्ये संधी मिळणार आहे. काही नावावर फेरविचार करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठक सुरू आहे. सध्याच्या राजकीय घडामोडीमुळे काही नावावर फेरविचार होऊ शकतो. कोणताही आरोप नसलेला स्वच्छ प्रतिमेचा नेता मंत्रिमंडळात असाचा अशी दोघांची इच्छा आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचे नाव कापले जाण्याची शक्यता आहे. अब्दुल सत्तार यांच्या मुलींचा नाव टीईटी परीक्षा घोटाळ्यात समोर आली आहे. त्यामुळे सत्तारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.