बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी अखेर राजीनामा दिलाय. बिहारमध्ये 5 वर्षानंतर नितीश कुमार यांचा पक्ष जेडीयू आणि भाजप यांच्यातील युती पुन्हा तुटली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जेडीयू खासदार आणि आमदारांच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे. माहितीनुसार जेडीयूच्या बैठकीत नितीश कुमार म्हणाले की भाजपने नेहमीच आम्हाला कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. भाजपने माझा अपमान केला. 2013 पासून आतापर्यंत भाजपने फसवणूक केली आहे, अशा आरोप त्यांनी केला आहे.
नितीशकुमार यांनी भाजपशी युती तोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं. पण नितीशकुमार यांनी हा अचानक घेतलेला निर्णय नाही. नितीशकुमार यांनी ठरवून घेतलेला हा निर्णय आहे. महाराष्ट्रात भाजपने जो शिंदे प्रयोग केला. तसाच प्रयोग बिहारमध्ये केला जात होता. त्याची कुणकुण नितीशकुमार यांना लागताच ते सावध झाले आणि शिंदे प्रयोग-2 बिहारमध्ये रंगण्याआधीच त्यांनी भाजपला वाऱ्यावर सोडून सवतासुभा मांडला आहे. भाजपला धक्का देत राष्ट्रीय जनता दल (RJD) सोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आज जनता दल यूनायटेड (JDU) ची बैठक पार पडली, या बैठकीत भाजपसोबतची युती तोडण्यावर निर्णय झाला.
बिहारचे शिंदे कोण? बिहारमध्ये भाजपने जेडीयूचे एक पूर्वीचे नेते आरसीपी सिंह यांच्या माध्यमातून जेडीयूमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आरसीपी सिंह हे जेडीयूचे राज्यसभेतील खासदार होते. त्यांना तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवण्यात आलं होतं. त्यांना केंद्रात मंत्रीपदही देण्यात आलं होतं. मात्र, चौथ्यांदा त्यांना राज्यसभेवर पाठवलं गेलं नाही. त्यामुळे त्यांचं मंत्रिपदही गेलं. त्यामुळे ते नाराज होते. आरसीपी सिंह यांच्यासाठी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ ललन सिंह यांना केंद्रात मंत्रिपद मिळू शकलं नव्हतं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. आरसीपी हे केंद्रात मंत्री बनण्यापूर्वी जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रीपद द्यावं लागलं होतं. पण त्यांना मंत्रीपद देणं नितीश कुमार यांनाही आवडलं नव्हतं. आरसीपी सिंह अनेक कारणांमुळे नितीश कुमार यांच्या नजरेतून उतरत चालले होते.