बेळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या बेळगावकरांना शनिवारी पावसाने दिलासा दिला. सुरु असलेल्या पावसामुळे चागंळीच दाणादाण उडाली. एकीकडे बेळगाव स्मार्ट सिटीने पहिला नंबर पटकावला असताना, दुसरीकडे याच स्मार्ट सिटीची खड्ड्यांनी कशी वाट लावली, याचा विदारक अनुभव पावसात सध्या बेळगावकर घेत आहेत. अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. अशातच शहरात झालेल्या पावसामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. पावसामुळे शहरातील रस्त्याचे तीन तेरा वाजले असून रस्त्यावर मोठी डबकी दिसत आहेत. बेळगाव शहरासह उपनगरांमधील रस्त्यांचीदेखील चाळण झाली आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यांत रस्ता अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
कोणत्याही शहराचा विकास हा रस्त्यांवर अवलंबून असतो. मात्र स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या शहरातील रस्ते व्हेंटिलेटरवर असल्यासारखे भासत आहेत. शहरामध्ये रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न सध्या शहरातील रस्त्यांची अवस्था पाहून पडत आहे. पावसाळ्यात ही गंभीर स्थिती नित्याचीच झाली आहे. थोडा पाऊस झाला तरी रस्त्यावर मोठं मोठे खड्डे पडतात, या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहन घसरण्याचे प्रकार घडत आहेत.
प्रामाणिकपणे कर भरुनही करदात्यांच्या वाट्याला महापालिका प्रशासनाने समस्यांचा डोंगर उभा केला आहे. बेळगाव महापालिकेच्या स्मार्ट सिटीअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून तयार केलेले रस्ते पावसाने कुचकामी ठरवले आहेत. खड्डे बुजवल्याचा दावा करणार्या महापालिकेविरोधातच कारवाई करावी, असा संतप्त सवाल वाहनचालकांसह नागरिकांकडून केला जात आहे. खड्डे बुजवण्याची महापालिकेची मोहीम म्हणजे त्या खड्ड्यांमध्ये मुरूम टाकणे व रस्ता दुरुस्ती म्हणून ठेकेदाराची बिले काढण्याचा उद्योग सुरू आहे. या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघात होवू शकतात. तसेच, वाहनांचेदेखील नुकसान होवू शकते. धोकादायक बनलेल्या रस्त्यांवरून जीव मुठीत धरून बेळगावकरांना रोज मार्गक्रमण करावे लागते. पालिकेविरोधात आंदोलन करणारे राजकीय पक्षदेखील रस्त्यांबाबत फार उग्र बनलेले दिसत नाहीत किंवा आंदोलन करताना दिसत नाहीत.