मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यावरून राजकारण सुरू असतानाच ऑनलाइन व्यवहारात आघाडीवर असलेली फोन पे कंपनीसुद्धा महाराष्ट्रातून आपला गाशा गुंडाळत आहे. फोन पे कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय मुंबईतील अंधेरी इथे आहे. आता कंपनी हे कार्यालय मुंबईतून कर्नाटकात हलवत आहे. कंपनी कायदा 2013 च्या कलम 13 अंतर्गत कंपनीने त्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे.
याबाबतची कंपनीने नोटीस प्रसिद्धीस दिलीअसून त्याद्वारे ही माहिती समोर आली आहे. याबाबतचा ठराव कंपनीच्या 16 ऑगस्ट रोजी झालेल्या आमसभेत करण्यात आल्याचेही या नोटिशीत म्हटले आहे. कंपनीने कार्यालय महाराष्ट्राबाहेर हलवण्याबाबत केलेला अर्ज केंद्र सरकारने मंजूर केल्यानंतर फोन पेचे नोंदणीकृत कार्यालय बेंगळुरुला हलवले जाणार आहे. यामुळे महाराष्ट्राला या कंपनीच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्यवहारावर पाणी सोडावे लागणार आहे.