मागील तीन दिवस नागपूरात पाऊस पडल्याने विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी ओलीच होती. आज दिवसभर पाऊस पडला नसला तरी मैदान सुकवण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. त्यामुळेच 6.30, 7 आणि 8 वाजता अम्पायर्स व सामनाधिकाऱ्यांकडून खेळपट्टीची पाहणी केली गेली. भारतीय संघाला ट्वेंटी-20 मालिका वाचवण्यासाठी आजचा सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज दिवसभर पाऊस नसूनही सामना वेळेत सुरू होत नसल्याने उपस्थित प्रेक्षकांचा संयम सुटताना दिसत होता. आता चौथ्यांदा पाहणी होईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल.
मागील तीन दिवस येथे पाऊस सतत सुरू असल्याने खेळपट्टी अजूनही हवी तशी सुकलेली नव्हती. सायंकाळी 6.30 वाजता नाणेफेक होणार होती, परंतु अम्पायर्सनी खेळपट्टीची पाहणी केली आणि आता 7 वाजता पुन्हा पाहणी झाली. तेव्हाही अम्पायर्स खेळपट्टीबाबत समाधानी दिसले नाही आणि त्यांनी दोन्ही कर्णधारांना बोलावून परिस्थितीबाबत सांगितले. 8 वाजता पुन्हा पाहणी केली जाणार असल्याने षटकांची संख्या कमी होईल हे निश्चित आहे. रोहित मात्र नाराज दिसला.
केएन अनंथपद्मनाभन आणि नितीन मेनन यांनी खेळपट्टीची पाहणी केली. त्यांच्यासोबत चौथा अम्पायर अनिल चौधरी हेही उपस्थित होते. खेळपट्टी ओली असल्याने खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर एकाही खेळाडूचे जखमी होणे संघाला महागात पडणारे ठरेल. त्यामुळे अम्पायर पूर्ण सहानिशा करताना दिसले. 8 वाजता खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर अम्पायर्सनी दोन्ही कर्णधारांशी संवाद साधला. आता पुन्हा 8.45 वाजता खेळपट्टीची पाहणी केली जाईल आणि 9.46 चा कट ऑफ टाईम ठरला. त्यानंतर 5-5 षटकांचा सामना खेळवण्यात येईल.