ऑक्टोबर महिन्यापासून भारतात इंटरनेट सेवा सुस्साट होणार आहे. भारतात 1 ऑक्टोबर 2022 पासून 5G इंटरनेट सेवा (5G Internet Services) सुरु होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचा शुभारंभ होईल. यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. एका अहवालात समोर आलं आहे की, 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये (सुमारे 455 अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्यता आहे.
ऑगस्ट महिन्यात 5जी स्पेक्ट्रमचा लिलाव पार पडला होता. त्यावेळी केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देशभरात 12 ऑक्टोबरपर्यंत 5G सेवा सुरु होईल अशी माहिती दिली होती. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यापासून भारतामध्ये 5G इंटरनेट सेवा उपलब्ध असेल. सरकारच्या राष्ट्रीय ब्रॉडबँड मिशनने यासंदर्भात ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, 'भारताचे डिजिटल परिवर्तन आणि कनेक्टिव्हिटीला नवीन उंचीवर नेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात 5G सेवेचा शुभारंभ होईल. 'इंडिया मोबाइल काँग्रेस' या आशियातील सर्वात मोठे तंत्रज्ञान प्रदर्शनात या योजनेचा शुभारंभ होईल.'
भारत सरकारने अल्पावधीत देशात 5G इंटरनेट सेवांचे 80 टक्के कव्हरेज करण्याचं लक्ष्य ठेवल्याचं, असे केंद्रीय तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होतं. तज्ज्ञांच्या मते, 5G तंत्रज्ञानाचा भारताला खूप फायदा होईल. याचा भारतीय अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे.