लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण असतो. या दिवसापासून आयुष्यातील बऱ्याच गोष्टी बदलतात. मात्र, कधीकधी हेच लग्न संकट बनूनही येतं. राजस्थानमधून अशीच एक घटना समोर आली आहे. चुरू जिल्ह्यातील रतनगढ तालुक्यात लग्नाच्या अवघ्या सहा दिवसांतच दागिने आणि रोख रक्कम चोरून नवरी पळून गेली. सकाळी या घटनेची माहिती पतीला समजताच त्याला धक्काच बसला. यानंतर खोलीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचंही पतीच्या लक्षात आलं.
कुटुंबीयांनी अनेक दिवस नववधूचा शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. वैतागलेल्या पीडित पतीने पोलिसात जाऊन वधूसह दोन दलालांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेले एसआय माणकलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रतनगड येथील रहिवासी नवरतन सांखला यांनी सांगितलं की, 7 ऑगस्ट रोजी ते चुरू येथील नातेवाईकांकडे आला होते. तिथे त्याला घंटाळ येथील रहिवासी काळू भेटला. काळूने त्याचं लग्न जमवण्याचं आश्वासन देत लग्नाची फी म्हणून 2 लाख रुपये घेतले.
15 ऑगस्ट रोजी दुपारी काळू गाडी घेऊन नवरतनच्या घरी आला. तो म्हणाला की तो एका गरीब कुटुंबाला ओळखतो, ज्यांना आपल्या मुलीचे लग्न करायचे होते. कुटुंब गरीब आहे, त्यामुळे लग्नाचा खर्च तुम्हालाच करावा लागेल. नवरतनने हे ऐकून त्याला दोन लाख रुपये दिले. 17 ऑगस्टच्या रात्री काळू हा त्याचा साथीदार मुकेशसोबत गाडी घेऊन त्याच्या घरी आला. नवरतनच्या नातेवाईकांना गाडीत बसवून रात्री अलिगडला नेण्यात आलं.
18 ऑगस्टला सकाळी तो सर्व लोकांना घेऊन एका घरात गेला. काळूने मुलीची ओळख करून दिली आणि तिचं नाव प्रियांका चौहान (वय 28) असं सांगितलं. मुलीला लग्नासाठी संमती विचारली असता तिने होकार दिला आणि मुलगा आवडल्याचे सांगितले. मग कोर्टात जाऊन लग्न केलं. 19 ऑगस्ट रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास प्रियंका चौहान नवरदेवाच्या घरी पोहोचली. पीडित पतीने वधूचा एक व्हिडिओ पोलिसांना दाखवला ज्यामध्ये ती नाचताना दिसत आहे. पीडित व्यक्तीने सांगितलं की ती पळून जाईल याबद्दल आम्हाला कोणतीही शंका नव्हती. नवरतनने सांगितलं की, 'लग्नानंतर सहा दिवसांनंतर 24 ऑगस्टच्या रात्री आम्ही जेवण करून झोपलो. रात्री तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान प्रियंका तिच्या साथीदारासह खोलीत ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने आणि 50000 रुपये घेऊन पळून गेली.'
प्रियांका चौहान पळून गेल्यानंतर पीडित पतीने दलालांशी संपर्क साधला. मात्र त्यांनी सांगितलं की आमचं काम फक्त लग्न जमवून देण्याचं आहे. वधू टिकेल की नाही याची आम्हाला शाश्वती नाही. याशिवाय पीडित पतीने नवरीचे आधार कार्ड तपासले असता तिचा आधार कार्ड क्रमांकही बनावट असल्याचं समोर आलं.