कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूरसह सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील काही गावांवर दावा केल्यामुळे सीमावाद पुन्हा पेटला आहे. यातच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने महाराष्टाला डिवचण्याचं काम सुरु आहे. सीमावाद आता दिल्ली दरबारी पोहचला असून महाराष्ट्र एकीकरण समितीने सीमावादावर मोठं पाऊल उचलले जाणार आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती आता पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिणार आहे. या पत्रात एकीकरण समिती कर्नाटक सरकारच्या कुरघोडीवर आपलं म्हणणं मांडणार आहे. तसेच समिती कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्र सरकारला जे वारंवार डिवचण्याचं काम करत आहेत त्यावर भाष्य करणार आहे. बोम्मई सरकार महाराष्ट्राच्या मंत्र्यांची अडवणूक करत असून त्यांना बेळगावात येऊ देत नसल्याचा ठपका या पत्रात ठेवला जाणार असून कर्नाटक सरकारकडून घटनात्मक नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप देखील एकीकरण समितीकडून या पत्रात करण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या मंत्र्यांना बेळगाव येथे न पाठवण्यास सांगितले आहे. सीमाभागात सध्या बनलेल्या तणावपूर्ण परिस्थितीत महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांनी कर्नाटकात येणे योग्य नाही. तसे केल्यास दोन्ही राज्यांमधील सीमावादामुळे सीमावर्ती जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्या मंत्र्यांनी कर्नाटकात येण्याचे धाडस केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा बोम्मई यांनी दिला आहे.