सध्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला आहे, तसेच यावरुन राजकारण देखील तापले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या जत तालुक्यातील काही गावांवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला असून, परिणामी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे. दरम्यान, सीमा बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारमधून दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, सीमाबांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री शंभूराज देसाई हे 6 डिसेंबरला म्हणजे आज बेळगावत जाणार होते, मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असं म्हटल्यावर या दोन मंत्र्यांनी दौरा रद्द केला. त्यामुळं यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी टिका केली आहे. ‘महापरीनिर्वाण दिन हा 6 डिसेंबरला असतो हे अख्ख्या देशाला माहिती आहे, त्यामुळे त्यांना 6 डिसेंबरची तारीख निवडताना माहिती नव्हतं का?’ असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. तसेच कर्नाटकच्या मंत्र्यांनी इशारा दिल्यानंतर तुम्ही घाबरला का? असा प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे. राज्याने कर्नाटकला जशाच तसे उत्तर देण्याची गरज असल्याचं देखील पवार म्हणाले.