मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटल्याचे दिसत आहे. याशिवाय, शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा बेळगाव दौरा रद्द झालेला असल्याने महाराष्ट्रात राजकीय वातावरणही तापलेलं आहे. अशातच आता बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ महाराष्ट्राच्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याची घटना घडल्याने हा वाद आणखी चिघळण्याची चिन्ह दिसत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून या मुद्द्य्यांवरून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनीही घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे.
‘कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध! आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हे जाणीवपूर्वक घडत आहे का? हे तातडीने न थांबल्यास मराठी माणसाच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा आम्हाला सीमा ओलांडून जावे लागेल.’ असं धनंजय मुंडे ट्वीटद्वारे म्हणाले आहेत.