बेळगाव / बंगळूर : काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भाजपच्या राज्य आणि केंद्रीय नेत्यांवर निवडणुकीदरम्यान मतदारांना पैसे वाटून आमीष दाखविण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल कारवाई करण्याची विनंती केली. पक्षाने कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. माजी मंत्री आणि गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांनी 22 जानेवारीला भाजप प्रत्येक मतदाराला 6000 रुपये देईल, असे सांगितले होते.
राज्यातील मतदारांना तीस हजार कोटी रुपये वाटप करण्याच्या मोठ्या कटाचा हा एक भाग आहे, असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे. पक्षाने यापूर्वी रमेश जारकीहोळी, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती.
दरम्यान, बंगळूरमधील शिवाजीनगरचे काँग्रेसचे आमदार रिझवान अर्शद यांनी आरोप केला आहे की, निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील 9115 मते कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. 9115 मतांपैकी आठ हजार अल्पसंख्याक समुदायाचे मतदार आहेत.