बेळगाव : टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाची एक बाजू पाच महिन्यांपूर्वी खुली करण्यात आली आहे. आता दुसऱ्या बाजूचे कामही आठवडाभरात हाती घेण्यात येणार आहे. यासाठी साहित्याची जुळवाजुळव करण्यात आली असून 17 कोटी रुपयांतून हे काम केले जात आहे. नऊ महिन्यांत हे उड्डाणपूल पूर्ण करण्याचा कालावधी असून 580 मीटर लांब व 10 मीटर रुंद असा हा पूल असेल. नैर्ऋत्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून या पुलाचे काम केले जात आहे.
तिसऱ्या रेल्वे फाटकावरील उड्डाणपुलाच्या कामाला 2019 मध्ये सुरुवात झाली होती. कोरोनामुळे पुलाचे काम लांबल्याने वाहतूक कोंडीची समस्या नेहमीच येत होती. अखेर 12 ऑक्टोबर 2022 रोजी या पुलाच्या एका बाजूचे उदघाटन झाले. मात्र, दुसऱ्या बाजूचे काम सुरु होण्यास चार महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली आहे. सध्या या ठिकाणी साहित्य आणून टाकले जात असून सर्व साहित्य दाखल झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी लागणारे लोखंडी सळ्यांचे साचे, मशिनरी, पाईप आदी साहित्य आणून टाकण्यात आले आहे. हे कामही लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.
तिसऱ्या फाटकावरील उड्डाणपुलाची एक बाजू तयार होण्यास चार वर्षांचा कालावधी लागला. कोरोनामुळे काम करताना अडचणी आल्यामुळे हा कालावधी गेला. मात्र, सध्या कोणत्याही अडचणी नाहीत. त्यामुळे दुसऱ्या बाजूचे काम लवकरच सुरु करुन ते कामही लवकर पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे. हा पुल खुला झाल्यापासून या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, उड्डाणपुलाची दुसरी बाजू होणार की नाही? याबाबत रेल्वेनेही कोणतीच माहिती दिली नव्हती. यामुळे बेळगावकर संभ्रमात होते. आता या ठिकाणी साहित्य पडल्याने हे कामही लवकरच सुरु होणार आहे.