बेळगाव—belgavkar : अधिकाऱ्यांकडून झालेल्या किरकोळ चुकीचे प्रकरण मोठे करून आमदार अभय पाटील अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे अनेक संघटना आंदोलन करत आहेत. सरकारकडे दाद मागण्याऐवजी केंद्रीय एजन्सीकडे तक्रार करण्यात येत आहे. आम्ही स्वतःहून महापालिका बरखास्तीसाठी प्रयत्न करणार नाही, असे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.
महापालिकेत बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, घरपट्टी वाढीसंदर्भात झालेल्या ठरावात तारखेची चूक झाली आहे. ती समोरासमोर बोलून दूर करता येते. पण, हे प्रकरण नाहक वाढविण्यात आले. अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांच्याविरोधात सभागृहात ठराव करण्यात आला. हा प्रकार योग्य नाही. सरकारकडे दाद मागण्याऐवजी केंद्रीय संस्थांकडे तक्रार करण्यात आली. पण, आयुक्तांनी केलेली चूक हा काही भ्रष्टाचार नाही वा गुन्हाही नाही. त्यामुळे, आमदार पाटील यांनी आपला हेका सोडणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
घरात बसून पाटीलकी करता येत नाही. लोकप्रतिनिधींनी लोकांत मिसळून त्यांच्या समस्या सोडवणे आवश्यक असते. पण, महापौरांना स्वतःच्या मर्जीनुसार निर्णय घेण्याची मुभा आमदारांनी दिलेली नाही. घरपट्टी वाढीबाबतची मूळ फाईल गायब आहे. ही फाईल आमदारांच्या घरात असू शकते, असा आरोपही पालकमंत्री जारकीहोळी यांनी केला. यावेळी आमदार राजू सेट, विरोधी गटनेते मुजम्मील डोणी उपस्थित होते.