महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्रातील हा प्रकार सगळ्यांना हादरवून सोडणारा आहे. काळ्या जादूच्या संशयातून गावकऱ्यांनी एका पुरुष आणि महिलेला जिवंत जाळलं. दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 15 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. ही भयानक घटना गडचिरोली जिल्ह्यातील एट्टापल्ली तालुक्यातील बारसेवाडा गावात घडली. पोलिसांना गुरुवारी या बद्दल समजलं. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन 15 आरोपींना अटक केली.
आरोपींनी देउ अतलामी (57) आणि जमनी तेलामी (52) यांना घरातून खेचून बाहेर आणलं. 3 तास त्यांना मारहाण केली. ते दोघेही दयेची भीख मागत होते. पण कोणाला त्यांची दया आली नाही. संपूर्ण गाव तमाशा बघत होतं. त्यानंतर आरोपींनी त्या दोघांना जिवंत जाळलं. त्यांचा अत्यंत वेदनादायी अंत झाला. जिल्हा पोलिसातील एका अधिकाऱ्याने पीटीआयला ही माहिती दिली. पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपींनी दोघांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह गावातील एका नाल्यात टाकले. पोलिसांना दुसऱ्यादिवशी या धक्कादायक घटनेबद्दल समजलं.
घरात लागोपाठ होणाऱ्या मृत्युसत्रास जबाबदार धरून पुजारी म्हणून काम करणाऱ्या महिलेसह पुरुषास जिवंत जाळून ठार केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील बारसेवाडा येथे शुक्रवारी उघडकीस आली. पोलिसांनी 15 आरोपींना जेरबंद केले असून मृत महिलेच्या पतीसह मुलाचा आरोपींत समावेश आहे. काळी जादू म्हणजे नेमकं काय झालेलं? : पोलीस अधिकाऱ्याने गुन्ह्याच्या कारणांमागचा खुलासा केला. शेजारच्या बोलेपल्लीमध्ये एकापाठोपाठ एक तीन मृत्यू झाले होते. यामध्ये आरोपींना देउ अतलामी आणि जमनी तेलामी यांनी काळी जादू केल्याचा संशय होता. त्या तीन मृत्यूंसाठी आरोपींनी देउ अतलामी आणि जमनी तेलामी यांना जबाबदार धरलं. तेलामीचा नवरा आणि मुलगा सुद्धा या हत्येमध्ये सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
बारसेवाडा येथील एका महिलेचा 2 वर्षांपूर्वी गर्भपात झाला. त्यानंतर महिन्यापूर्वी याच कुटुंबातील एका महिन्याच्या मुलीचा मृत्यू झाला. 1 मे रोजी दीड वर्षाच्या मुलीचाही मृत्यू झाला. लागोपाठ मृत्यूने कुटुंब तर हादरलेच, पण गावालाही धक्का बसला. जननी व देवू हे दोघे जादूटोणा करत असल्याचा संशय कुटुंबास होता. यातून 1 मे रोजी जननी व देवू यांना रात्री घरी जाऊन अमानुष मारहाण केली. त्यानंतर गावापासून एक किलोमीटर अंतरावरील नाल्यात नेऊन जिवंत जाळण्यात आले. यात दोघांचाही मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी कलम 302, 307, 201, 143, 147, 149 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. फरार आरोपींचा शोध सुरु आहे. आरोपींना अहेरीच्या प्रथम श्रेणी कोर्टासमोर हजर करण्यात आलं. सर्व आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सखोल चौकशी अंती 15 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये 1) अजय बापु तेलामी, 2) भाऊजी शत्रु तेलामी, 3) अमित समा मडावी, 4) मिरवा तेलामी, 5) बापु कंदरु तेलामी, 6) सोमजी कंदरु तेलामी, 7) दिनेश कोलु तेलामी, 8) श्रीहरी बीरजा तेलामी, 9) मधुकर देवु पोई, 10) अमित ऊर्फ नागेश रामजी तेलामी, 11) गणेश बाजु हेडो, 12) मधुकर शत्रु तेलामी, 13) देवाजी मुहोंदा तेलामी, 14) दिवाकर देवाजी तेलामी, 15) बिरजा तेलामी सर्व रा. बारसेवाडा ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांना पोस्टे एटापल्ली अप. क्र. 24/2024 मधील कलम 302, 307, 201, 143, 147, 149, भादवी, सहकलम 3 (2) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अन्वये दाखल गुन्हयात अटक करण्यात आली. सर्व आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायालय, अहेरी येथे हजर केले असता सर्व आरोपींना 05 दिवसांची पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली.