बेळगाव : दिल्लीमध्ये चार महिन्यांपूर्वी झालेल्या नेतेमंडळींच्या बैठकीत सुरेश अंगडी यांंना कर्नाटकचे मुख्यमंत्री करण्याचे ठरले होते, असा गौप्यस्फोट अंगडी यांचे मामा लिंगराज पाटील यांनी केला. अंगडी यांच्या कुटुंबीयांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचे तिकीट देण्यात यावे, अशी मागणी आपण भाजप नेत्यांकडे केली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांच्या या गौप्यस्फोटाने खळबळ उडाली आहे. लिंगराज पाटील हे मंगळवारी सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, चार महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये भाजपातील वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली होती. बैठकीला भाजपचे कर्नाटकचे प्रभारी मुरलीधर राव उपस्थित होते. या बैठकीत सुरेश अंगडी यांना कर्नाटकचे मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सुरेश अंगडी हे निष्कलंक, सज्जन आणि प्रामाणिक नेते आहेत. त्याचबरोबर ते लिंगायत समाजातील आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपद दिल्यास भाजपची प्रतिमा सुधारण्यास मदत होईल, अशी चर्चाही यावेळी झाली होती. या बैठकीला मीही उपस्थित हातोे. यावेळी मुरलीधर राव यांच्याशी सुरेश अंगडी यांनी माझा परिचयही करुन दिला होता, असे त्यांनी सांगितले.
सुरेश अंगडी यांच्या रिक्त जागेवर होणार्या लोकसभेच्या जागेसाठी त्यांची पत्नी मंगला किंवा त्यांची मुलगी स्फूर्ती किंवा श्रध्दा यांना तिकीट देण्यात यावे, अशी मागणी आपण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांच्याकडे केली असल्याची माहितीही यावेळी लिंगराज पाटील यांनी दिली. सुरेश अंगडी यांच्या कुटुंबीयांंनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींकडे तिकिटाची मागणी करावी, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी व्यक्त केले. आगामी लोकसभा पोटनिवडणुकीसाठी त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला तिकीट द्यावे, अशी कार्यकर्त्यांकडून मागणी होत आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनीही भाजप पक्षश्रेंष्ठीकडे मागणी करावी. याबाबत चर्चा करुन आम्हीही शिफारस करु. रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निवासस्थानी भाजप राज्याध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी भेट देऊन सुरेश अंगडी कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी आमदार आनंद मामनी, खासदार इरण्णा कडाडी, आमदार अभय पाटील, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील आदी उपस्थित होते.
अंगडी केंद्रीय मंत्री असल्याचे एम्सच्या डॉक्टरांना माहितच नव्हते..नवी दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची (AIMS एम्स) शाखा बेळगावात सुरु करण्याचा प्रयत्न रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी करत होते. पण, एम्समध्ये दाखल केल्यानंतर उपचार करणार्या डॉक्टरांना अंगडी यांची स्थिती चिंताजनक झाल्यानंतर ते केंद्रीय राज्यमंत्री असल्याचे समजले. आठवड्यानंतर याबाबतची माहिती मंगळवारी उघड झाली आहे. कोरोना संसर्ग सुरु झाल्यानंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. गेल्या वीस दिवसांपूर्वी सुरेश अंगडी एका वकिलांसोबत नवी दिल्लीतील आपल्या निवासात गेले होते. त्या वकिलांना कोरोनाची लागण झाली. लक्षणे दिसू लागली तरी अंगडी यांनी त्यांच्याबरोबर प्रवास केला. ते बंगळूरला आले. त्यांनी वकिलांना मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तेथून ते बेळगावला आले. पण, त्यांनी स्वत:ची कोरोना चाचणी करुन घेतली नाही की ते क्वारंटाईन झाले नव्हते. एका रात्री त्यांना ताप आला. डॉक्टर असणार्या जावयांशी संपर्क साधून त्यांनी दाडदुखी असून त्यामुळे ताप आल्याचे सांगितले आणि गोळ्या घेतल्या. त्यांच्या मुलीने त्यांना कोरोना चाचणी करण्याबाबत विचारले. पण, अंगडी यांनी दिल्लीतील अधिवेशनाआधी चाचणी सक्तीची असल्याने तेथेच करुन घेईन, असे सांगितले. दिल्लीत चाचणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. खोकला व काही लक्षणे असल्याने त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले. एम्समध्ये दाखल झाल्यानंतर तीनच दिवसांत त्यांचे ऑक्सिजन लेव्हल 70 पर्यंत खाली आले. सामान्य माणसाचे ऑक्सिजन लेव्हल 90 असावे लागते. त्यानंतर तातडीने त्यांच्या कुटुंबीयांना बोलावून घेण्यात आले. डॉक्टर असणार्या जावयांनी त्यांच्या विविध चाचण्या करुन घेतल्या. त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर ते केंद्रीय मंत्री असल्याचे तेथील डॉक्टरांना समजले.