बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज, 1 नोव्हेंबर हा 'काळा दिवस' पाळला जात आहे. भाषावर प्रांतरचनेच्यावेळी बेळगावसह सीमावर्ती मराठीबहुल भाग कर्नाटकात डांबल्याच्या निषेधार्थ हा दिवस पाळला जातो. कोरोना महामारीमुळे यंदाची मराठी भाषिकांच्या निषेध सायकल फेरी आणि जाहीर सभा रद्द करण्यात आली. त्याऐवजी मराठा मंदिर येथे धरणे आंदोलन प्रशासनाने परवानगी दिली. पण ही परवानगी देत असताना लोकांनी आंदोलन स्थळांपर्यंत पोहोचू नये, यासाठी पोलिसांकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. एकावेळी केवळ 50 लोक आंदोलनात सहभागी होणार आहेत. टप्प्याने आंदोलनात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या मराठी भाषिकांची कोंडी केली जात होती.
बेळगावात मराठी भाषिकांच्या निषेध मेळाव्याला मराठा मंदिर कार्यालयात सुरुवात झाली. यावेळी कर्नाटक सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. रविवारी सकाळपासूनच शहरातील विविध मार्गांवर कर्नाटक पोलिसांनी नाकाबंदी करण्यात केली होती. मराठा मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतुकीला बंदी घातली. लोकांची कसून चौकशी करण्यात येत होती. काळे कपडे घातलेल्या लोकांना जाब विचारण्यात येत होता. पोलिसांच्या या मुस्कटदाबीचा तीव्र संताप व्यक्त होत असून हे धरणे आंदोलन दुपारीपर्यंत चालले आहे. मात्र, दुसरीकडे कर्नाटक पोलिसांकडून मराठी भाषिकांची मुस्कटदाबी सुरूच आहे. असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर अक्षरश: गनिमी काव्यानं मराठी भाषिकांच्या मेळाव्याला उपस्थित झाल्या आहेत. रूपाली चाकणकर यांना बेळगावात पोहोचण्यासाठी रिक्षानं प्रवास करावा लागला.
दुसरीकडे, कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा मराठा बांधवांच्या कार्यक्रमस्थळी गोंधळ घातला होता. रेल्वे ओव्हर ब्रिज येथील मराठा मंदिर येथे मराठी भाषिकांच्या मेळाव्यात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी एक प्रतिनिधी या सभेला येत असतो. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वतीने मंगेश चिवटे देखील मेळाव्याला उपस्थित झाले आहेत.
संयुक्त महाराष्ट्रासाठी सीमाभागाचे हौतात्म्य विसरलेले नाहीसमन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांचे सहाय्यक मंगेश चिवटे यावेळी बोलताना म्हणाले की, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सीमाभागाने पहिले चार हुतात्मे दिले. त्याचे स्मरण आम्हा महाराष्ट्रातील सर्वांना आहे. त्यामुळे त्या हुतात्म्यांचे बलिदान आणि त्याचे स्मरण ठेवून सीमा बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी सदैव सज्ज आहोत. अशी ग्वाही मंगेश चिवटे यांनी दिली. सूर्य-चंद्र असेपर्यंत सीमाभाग महाराष्ट्रात जाणार नाही असे म्हणणाऱ्यांना आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ. तसेच हा प्रश्न सोडवून घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे पुढील काळात दिन आचरण करावे लागणार नाही असेही त्यांनी ठणकावले.
यावेळी मध्यवर्तीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी विचार मांडले. महाराष्ट्राने या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मात्र, यापुढील काळात महाराष्ट्रातील नेतेमंडळीनी अधिक कृतिशील होऊन त्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करावेत असे विचार त्यांनी व्यक्त केले. चंदगड येथून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी वाघमारे यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर मध्यवर्तीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर, जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील, माजी महापौर सरिता पाटील, महादेव पाटील, ॲड. शंकर पाटील, रामचंद्र मोदगेकर, सुरेश पाटील, रामा शिंदोळकर, धनंजय पाटील, गणेश दड्डीकर यांनी विचार मांडले. यावेळी युवा समितीचे शुभम शेळके, रणजीत चव्हाण पाटील, नेताजी जाधव, प्रकाश मरगाळे, रेणू किल्लेकर , शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर , आर. आय.पाटील, अप्पासाहेब गुरव, लक्ष्मण होनगेकर यांच्यासह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.