कर्नाटकात मराठा विकास प्राधिकरण; आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक विकासासाठी मराठा विकास प्राधिकरणकर्नाटक सरकारने मराठा समाज विकास प्राधिकरणाची घोषणा केली आहे. त्यासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरापा यांच्या सूचनेनुसार शनिवारी राज्याच्या मागास समाज विकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव गंगाराम बडेरिया यांनी आदेश बजावला आहे. राज्यात मराठा समाजाचे लोक मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक विकासासाठी मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना केल्या आहेत. एकीकडे बेळगावात मराठी भाषिकांनी डिवचले जात असताना आणि ज्या कर्नाटक सरकारने बेळगाव चे नामकरण केले त्याच राज्य सरकारने राजकारणासाठी या प्राधिकरणासाठी 50 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आगामी बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीवर डोळा ठेवून मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी मराठा विकास प्राधिकरणाची घोषणा केली. मात्र, मराठीची कावीळ झालेल्या कन्नडिगांनी त्याविरुद्ध थयथयाट सुरू केला आहे.
हा निर्णय सरकारने तातडीने मागे घ्यावा, नाहीतर उग्र आंदोलन करण्याचा इशारा कन्नड आंदोलनकर्ते व निर्माते सा. रा. गोविंद यांनी दिला आहे. कर्नाटकात विशेषतः उत्तर कर्नाटकात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. या समाजाला खूश करुन लोकसभेच्या पोटनिवडणुकीत त्यांचा पाठिंबा मिळविण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी प्राधिकरणाची घोषणा केली. परंतु, सातत्याने मराठीविरुध्द गरळ ओकणाऱ्या काही कन्नडिगांनी त्याविरुध्द आगपाखड करण्यास सुरुवात केली आहे. सा. रा. गोविंद यांनी तर मराठी, महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते व महाराष्ट्रातील नेत्यांविरुध्द रविवारी गरळ ओकली. तसेच मुख्यमंत्र्यांना मराठा प्राधिकरणाचा निर्णय मागे घेण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्र्यांना हा सल्ला कोणी दिला माहीत नाही. राज्यात मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. बेळगाव, बिदरसह उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटकातही मराठा समाज असून भाजपला नेहमीच मराठा समाजाचा पाठिंबा मिळत आला आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावात दरवर्षी काळा दिन साजरा करते. बेळगावात मराठीकडून कन्नडिगांवर दडपशाही करण्यात येते. महाराष्ट्राचे नेते बेळगावात येऊन प्रक्षोभक भाषण करतात, असाही हास्यास्पद आरोप सा. रा. गोविंद यांनी केला.
समिती किंवा सीमाभागातील मराठी लोक आपल्या घटनात्मक हक्कासाठी लढत आहेत. याकडे दुर्लक्ष करून त्यांनी सीमाभागातील मराठी लोकांविरुध्द गरळ ओकली. दरम्यान, मराठा प्राधिकरणाची स्थापना करुन कन्नड विकास प्राधिकरण मुख्यमंत्री बंद करणार आहेत का ? उद्या तमिळ, आंध्राचे लोकही अशा प्राधिकरणाची मागणी करतील. त्या सर्वांसाठीच अशा प्राधिकरणाची ते स्थापना करणार का, असे प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहेत.
पोटनिवडणुकीवर नजर?बेळगाव लोकसभा मतदार संघ तसेच बिदर जिल्ह्यातील कल्याण विधानसभा मतदार संघात काही दिवसांत पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. या दोन्ही मतदार संघात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे मराठा समाजाची मते आपल्याकडे वळवण्यासाठी राज्य सरकारने ही घोषणा तातडीने केल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे. मराठा समाजाला खूश करण्यासाठी यापूर्वीही राज्यात शासकीय पातळीवर शिवजयंती साजरी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी घेतला होता. त्यानुसार त्यांनी राज्यात ती सुरुही केली. राज्याच्या अर्थसंकल्पात यापूर्वी त्यांनी 5 कोटी रुपये अनुदानही जाहीर केले होते ; मात्र त्याचा फायदा दक्षिण कर्नाटकपुरता मर्यादित राहिला होता. आता पुन्हा एकदा त्यांनी मराठा समाजाच्या विकासासाठी प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय घेत समाजाला आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे.