कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारने बळ्ळारी जिल्ह्याचे विभाजन करुन विजयनगर या नव्या जिल्हा घोषणेसाठी तत्वतः मान्यता घेऊन होसपेट, सांडूर या तालुक्यासह तेथील इतर तालुक्यातील जनतेला सुखद धक्का दिला. पण बेळगाव जिल्हा विभाजन करुन चिकोडी व गोकाक या दोन नव्या जिल्ह्यांच्या घोषणेसाठी मुख्यमंत्र्यांनी कोणतेच भाष्य न केल्याने चिकोडी उपविभागातील जनता नाराज झाली आहे. प्रत्येकवेळी बेळगाव जिल्हा विभाजनाची चर्चा सुरू होताच बेळगावच्या सीमाप्रश्नाचा विषय पुढे करत हा मुद्दा तसाच अडखळत राहतो. बेळगाव जिल्हा विभाजनासाठी जेव्हा आंदोलन पेटते तेव्हा सीमाप्रश्न व राजकीय इच्छाशक्तीची कमतरता यामुळे चिकोडी व गोकाक जिल्हा मागणी आंदोनल बारगळलेच जाते. तर दुसरी केवळ 2 वर्षाच्या कालावधीत बळ्ळारी जिल्हा विभाजनाची चर्चा सुरु होऊन त्या चर्चेस योग्य स्वरुप देण्यात तेथील लोकप्रतिनिधींनी यश साधले.
साडेतीन दशकापासून चिकोडी जिल्हा मागणीचे भिजत घोंगडे कायमच राहिले आहे. त्यास या भागातील स्वार्थी लोकप्रतिनिधीच कारणीभूत असल्याचे चिकोडी जिल्हा मागणी समितीचे प्रमुख बी. आर. संगाप्पागोळ म्हणतात. तसे पाहता बेळगाव जिल्हा विभाजन करून नव्या जिल्ह्यांची निर्मिती करणेच योग्य असल्याचे अहवाल देखील विविध आयोगांनी सरकार दरबारी मांडल्या आहेत. पण भाषावाद व सीमावादाची कारणमिमांसा देत येथील काही नेतेमंडळी स्वत : चे हित साधत आहेत. आता बेळगाव जिल्ह्यात अपवाद वगळता सर्वाधिक आमदार हे भाजपपेच आहेत. शिवाय सत्ताही भाजपची असल्याने जिल्हा विभाजन करून नवे जिल्हे घोषित करण्यात कोणतीच अडचण नाही. पण त्याकडे ऐनवेळी विश्वासघात केल्याप्रमाणे हा विषय तसाच राखला जात आहे. त्यामुळे स्वहिताकडेच जास्त पाहिले जात असल्याची खुलेआम चर्चा सुरू आहे.
बेळगावचे विभाजन झाल्यास नव्याने अस्तित्वात येणार्या चिकोडी जिल्ह्यात चिकोडी, अथणी, रायबाग, हुक्केरी, कागवाड आणि निपाणी या तालुक्यांचा समावेश होईल. आणि गोकाकमध्ये गोकाक, रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल, मुडलगी या तालुक्यांचा समावेश असेल. तर बेळगाव जिल्ह्यात कित्तूर, बेळगाव शहर-ग्रामीण, खानापूर या तालुक्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सोयीचे व्हावे, यासाठी बेळगाव जिल्हा विभाजनाचा विचार चालविला आहे. याआधी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वातील काँग्रेस सरकारने हिवाळी अधिवेशनावेळी बेळगाव जिल्हा विभाजन गरजेचे असल्याचे म्हटले होते. त्यावेळी गोकाक व चिकोडी तालुक्यातील जिल्हा मागणी आंदोलकामध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. आता येडियुराप्पांच्या मंत्रिमंडळाने विजयनगर जिल्हा रचनेविषीय हिरवा कंदील दाखविल्याने पुन्हा चिकोडी जिल्हा मागणी आंदोलक काय हालचाली करतात याकडेही सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.