बेळगाव : खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी सादर केलेल्या खानापूर बसस्थानकाच्या नूतनीकरण प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे खानापूरच्या नव्या बसस्थानकाचे प्रलंबित स्वप्न साकार होणार असल्याने अनेक वर्षापासूनची खानापूरकरांची सुसज्ज बसस्थानकाची मागणी पूर्णत्वाला येणार आहे. स्थानकाची दयनीय अवस्था लक्षात घेऊन आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम मनावर घेतले. संबंधित अधिकाऱ्यांना सुसज्ज आणि अद्ययावत बसस्थानकाचा आराखडा बनवण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी सुमारे 7 कोटी रुपयांचा आराखडा तयार करून राज्यसरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता. केवळ आराखडा पाठवून न थांबता बसस्थानक नूतनीकरणाच्या फाईलचा सरकार दरबारी आमदार डॉ. निंबाळकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन हे बसस्थानक तालुक्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे पटवून दिले. परिणामी राज्य सरकारने बस स्थानकाच्या नूतनीकरणाला मंजुरी दिली. वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाने 6 कोटी 93 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक बसस्थानकाच्या कामासाठी निविदा मागवल्या आहेत.
सुमारे 8 वर्षांपासून दुर्लक्षित तालुक्याचा संपूर्ण कायापालट करणे हेच आपले स्वप्न आणि ध्येय आहे. खानापूरचे प्रस्तावित बस स्थानक हा या विकास शृंखलेचाच एक टप्पा आहे. तसेच रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधांसोबतच खानापूर येथे महिला व शिशू चिकित्सेसाठी निर्माण होत असलेले विशेष इस्पितळ, शेतकऱ्यांसाठीची महसूल विभाग स्तरावरील विक्रीकेंद्रे अशा अनेक नवीन सुविधा प्रथमच खानापूर तालुक्यात येत आहेत. - आमदार डॉ. अजंली निंबाळकर